सातारा – महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून उद्या रविवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता “एक तारीख- एक तास’ हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
स्वच्छता पंधरवडा- “स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम दि. 15 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील सर्व गावांमध्ये व ग्रामपंचायतीमध्ये रविवारी एक तास श्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामस्थांव्दारे स्वच्छता करण्यात येणार असून या उपक्रमाचा दृष्य परिणाम दिसणार आहे. वॉर्ड, ग्रामपंचायतीअंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाइन, बस स्थानके, राष्ट्रीय, राज्य महामार्गाशेजारील जागा, जलस्त्रोत, नदी घाट, झोपडपट्टया, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खासगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोल नाके, प्राणी संग्राहालय, गो- शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, रहिवासी क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, अंगणवाडी परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर तसेच या क्षेत्रांतील महत्वाचे ठिकाण अशा ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी महिला बचतगट, युवा मंडळे, सहाय्यकारी संस्था (एनजीओ), ग्रामस्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या स्वच्छता उपक्रमासाठी आवश्यक असलेले झाडू, केर भरणी, कचरा पेटया, थैल्या इत्यादी साहित्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.