मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणुक कार्यालयाने अभिनेत्री माधुरी दीक्षित हीची सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केली आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी माधुरी दीक्षित काम करणार आहे. राज्यात पुढच्या महिन्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला या मतदानाचे निकाल हाती येणार आहेत.
लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात मतदारांच्या भूमिकेविषयी माधुरी दीक्षित एका व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान चला… करू मतदान ‘ शीर्षकाखालील व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित दिसणार आहे. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सद्भावना दूत म्हणून 12 ख्यातनाम व्यक्तींची नेमणूक केली. यात मृणाल कुलकर्णी, प्रशांत दामले, निशिगंधा वड, उषा जाधव, वैज्ञानिक अनिल काकोडकर, धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरवाल खाडे, नेमबाज राही सरनोबत, ट्रान्सजेंडर एक्टिव्हिटी गौरी सावंत इत्यादींचा समावेश होता.