साडेतीन ते चार हजार भाव देण्याचे आश्वासन रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा
राहुरी – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे भाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांनी घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर – मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने तीन तास 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. व्यापारी, बाजार समितीचे प्रतिनिधी व आंदोलक शेतकरी यांच्यात बराच काळ चर्चा चालली. अखेरीस साडेतीन हजार ते चार हजाराच्या दरम्यान भाव देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राहुरी बाजार समितीत आज 35 हजार कांदा गोण्यांची आवक होती. रविवारी कांद्याचे सरासरी भाव 3 हजार ते 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल निघाले होते. ते आज हे भाव अडीच हजार ते साडेतीन हजारच्या दरम्यान आले. त्यामुळे प्रतिक्विंटल शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखून धरले. संतप्त शेतकरी नगर-मनमाड राज्यमार्गावर ठिय्या धरून बसले. शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला भाव मिळालेच पाहिजेत, अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. सलग तीन वर्षे कांद्याला भाव मिळाले नाहीत. अगदी मातीमोल कांदा विकावा लागला. आणि आता कुठे समाधानकारक भाव मिळत आहेत. तर व्यापारी, सरकार शेतकऱ्यांच्या पदरात जादा भावाचे माप पडू देत नाही. म्हणून शेतकरी संतप्त झाले.तोडगा म्हणून बाजार समितीच्या आवारात चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार फसु उद्दिन शेख, उपसभापती अण्णासाहेब बाचकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, व्यापारी सुरेश बाफना, राकेश खाबिया, तुळशीराम कडू, विशाल मोरे, रमेश पवार बाजार समितीचे संचालक, आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेदरम्यान बरीच शाब्दिक खडाजंगी झाली. राहुरी बाजार समितीचे भाव सरासरी अन्य बाजारपेठेच्या बरोबरीने असून कुठेही कमी नाहीत. कांदा आवक वाढल्याने अन्यत्र जसेभाव कमी झाले. त्याच प्रमाणात राहुरीत बाजारभाव आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र या युक्तीवादाने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
दोन दिवसांपूर्वी भाव साडेचार हजार रुपये क्विंटल होते ते आज एकदम कमी का असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला. कांद्याचे फेरलिलाव करण्याचा प्रस्तावही मार्केट कमिटीतर्फे ठेवण्यात आला. मात्र आंदोलकांचे समाधान झाले नाही. तीन तासाच्या चर्चेनंतर सरासरी भाव साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान काढले, जातील असे आश्वासन व्यापारी व बाजार समितीतर्फे देण्यात आले.त्यानंतर आंदोलनाचा तिढा सुटला. आंदोलना दरम्यान प्रवासी व आंदोलक यांच्यात खडाजंगी झाल्या.
महाराष्ट्रभर कांदा मार्केट बंद करू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे आंदोलकांसमोर अडीच तासांनी आले. ते म्हणाले, अफगाणिस्तानातून केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. तीन वर्षे कांदा मातीमोल विकावा लागला. शेतकऱ्यांच्या पदरात जास्त भावाचे माप पडू नये, ही सरकारची भूमिका चुकीची आहे. शासनाच्या या भूमिकेमुळेच भाव कोसळले आहेत. वेळेत बदल धोरणात बदल केल्यास महाराष्ट्रभर कांदा मार्केट बंद केले जाईल.
एक तासापेक्षा जास्तवेळ आंदोलन
राज्य मार्गावर पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ आंदोलन करता येत नाही. एक तासापेक्षाही अधिक वेळ झाल्यानंतर किमान एकाबाजूने पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन करीत होते. मात्र आंदोलक त्यांचा इशारा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.