‘गरवारे’तील 207 विद्यार्थी नापास : चौकशी समितीचा अहवाल सादर
पुणे – विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती कमी, अंतर्गत व लेखी मूल्यमापनात प्रगती समाधानकारक नसल्यानेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील इयत्ता अकरावीत 207 विद्यार्थी नापास झाले. चौकशी समितीच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली.
करोनामुळे इयत्ता अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. प्रथम सत्र परीक्षा, चाचण्या, प्रात्यक्षिके व अंतर्गत मूल्यमापनातील प्राप्त गुणांचा विचार करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अकरावीच्या कला शाखेतील 60 तर, विज्ञान शाखेतील 147 विद्यार्थी नापास झाले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालक, विद्यार्थी संघटना यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन डॉ. मोरे यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने महाविद्यालयात समक्ष भेट देऊन तपासणी केली.
चौकशी समितीने अहवाल तयार करून तो डॉ.मोरे यांच्याकडे सादर केला. हा अहवाल अंतिम कार्यवाहीसाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे पाठवला आहे. या महाविद्यालयातील अकरावीचे नियमित वर्ग 6 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आले होते. अभ्यासक्रम अध्यापनानंतर प्रथम चाचणी परीक्षा 30 सप्टेंबरपासून, प्रथम सत्र परीक्षा 21 नोव्हेंबरपासून व दुसरी चाचणी परीक्षा 16 जानेवारीपासून घेण्यात आली. जे विद्यार्थी चाचणी परीक्षेला अनुत्तीर्ण होते त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. 26 मे रोजी महाविद्यालयाने ऑनलाइनद्वारे संकेतस्थळावर निकाल जाहीर केला.
चौकशी समितीचे निष्कर्ष
– वार्षिक परीक्षा रद्द केल्याने निकालात मोठा बदल झाल्याचे आढळत नाही.
– मागील तीन वर्षांच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात फारसा फरक नाही.
– अकरावीतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीच्या वर्गात प्रवेश द्यावा, अशा शासन सूचना नाहीत.
– अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिल्यास पुनर्मूल्यांकन केल्यास काही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतील.