नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दंड थोपटलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंद यशस्वी केला. काही ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र तरीही शेतकऱ्यांचे हे आंदोलन कमालीचे यशस्वी झाले आहे.
शेतकऱ्यांच्या या बंदला मालवाहतूकदारांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आज देशभरात मालवाहतूक सेवा ठप्प होती. यामुळे मालवाहतूकदारांचे सुमारे 2 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा अगोदरच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस संघटनेकडून दिली होती. त्यानुसार सुमारे 90 लाख ट्रक, टेम्पो जागीच थांबून होते. आज मालवाहतूकदारांनी देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने केली.
मालवाहतूकदारांनी बंदला दिलेला पाठिंबा यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांमुळेच देश जिवंत असून त्यांच्या मालाची ने-आण करण्यामुळे मालवाहतूक सेवा जिवंत असल्याचे मतही या संघटनेने यावेळी व्यक्त केले.