मुंबई/नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावला आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार संपल्यानंतर उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर छुप्या प्रचारावर असणार आहे.
अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे. यात १२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल मैदानात उतरले आहे.
दुसरीकडे राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेऊन मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. चंद्रपूरमध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारासाठी अभिनेता सुनील शेट्टीने रॉड शो केला होता.
काँग्रेस उमेदवारांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या. याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह जिल्हा नेत्यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतःला झोकून दिले आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने जोर लावलेला असताना महाविकास आघाडीत उमेदवारांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांना वहावी लागत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर काँग्रेसचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या स्टार प्रचारकांनी निवडणूक प्रचारापासून लांब राहणे पसंत केले आहे.