नवी दिल्ली : देशामधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश राज्यालाही एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांवर टोळधाड पडली. मध्य प्रदेशमधील पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारोच्या संख्येने टोळ दिसून आले. एका वृत्तसंस्थेने याविषयी दिली आहे.
पानबिहारमधील अनेक गावांमध्ये हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. येथील रणहेरा गावात टोळांची संख्या इतकी होती की सरकारी यंत्रणांनी येथे औषध फवारणी केली. या टोळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ स्वेअर किलोमीटरच्या परिसरात औषधांची फवारणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम सिंह यांनी दिली. हे टोळ राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या टोळधाडींचा फटका बसला आहे. पानबिहारबरोबरच नीमचच्या बाजूने पडलेल्या टोळधाडींमुळे हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना या ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी टोळधाड कधीही न पाहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळी शेतांवर मोठ्या संख्येने टोळधाडी पडताना पाहून सुरुवातील शेतकरी गोंधळले. त्यानंतर टोळांना पळवून लावण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी वाजवून आवाज करण्यास सुरुवात केली. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेत पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला.