औरंगाबाद : कोरोनाचा प्रसार वाढताच शहरात व्यवसाय, शिक्षण, नोकरीसाठी गेलेल्या गावातील नागरिकांनी रातोरात गावाकडे धूम ठोकली आहे. त्यामुळे दरेगाव येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गाव पूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. शहरातून आलेल्या नागरिकांना गावात येताच ग्रामपंचायतीमध्ये त्यांची नोंद करण्यात येत आहे, तसेच काहींना तपासणीचे प्रमाणपत्र आणावे लागत आहे तर, काहींना शेतात, घरात बसावे लागत आहे. बाहेर गावातून आलेल्या नागरिकांनी कोणाच्याही संपर्कात येऊ नये, गावात कोठेही फिरू नये अशा सूचना गावातील नागरिकांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता माणुसकी काहीशी थिजली असून, कोणीही मदत करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाही. तसेच गावातील नागरिकांनीही अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या गावकऱ्यांना वैद्यकीय कामासाठी बाहेर जायचे आहे त्यांना कोरोना विषाणू प्रतिबंध समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्यांना जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी बाहेर गावी जायचे आहे, त्यांनाही समितीकडे नाव नोंदवणे गरजेचे आहे.
तसेच समितीला गावातील किराणा दुकाने, आणि इतर दुकानातून विकल्या जाणाऱ्या मालाचे दर तपासण्याचा अधिकार असल्याचे सरपंच जयश्री बोर्डे यांनी सांगितले, तर गावात कोणी गुटका, तंबाखू, मद्य विक्री करताना आढळल्यास त्यांची माहिती प्रशासनाला देण्यात येईल, अशी माहिती सुभाष जाधव यांनी दिली. गावातील कोणत्याही नागरिकांकडे देशातील कोणत्याही ठिकाणावरून पाहुणे आल्यास त्यांची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी लागणार आहे. तर अशा पाहुण्याची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात येणार आहे, असे उपसरपंच विलासदादा गायकवाड यांनी दिलीं.
सध्या गावातील रस्ते काटेरी झुडपे, लाकडे,दगडाने बंद करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी चक्क जेसीबीच्या साह्याने रस्ते खोदून बंद करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच विलास दादा गायकवाड, आजीनाथ लहाने, मगन गायकवाड, शेषराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य गोरख गायकवाड, संदिप गायकवाड, सतिष दापके, ज्ञानेश्वर गायकवाड, तंटा मुक्ति अध्यक्ष सि.बि. गायकवाड, सतिष गायकवाड, भानुदास घोलप आदी उपस्थित होते.