सातारा – आनेवाडी टोलनाक्यावर गत काही वर्षांपासून सुरु झालेल्या काही ठराविक खाद्यपदार्थ दुकानामुळे टोल नाक्यावर अपघातांची मालिका सुरु झाली आहे. गेल्यावर्षी या दुकानामध्ये खाद्यपदार्थ खरेदी करुन निघालेल्या एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका ऊसतोस मजुराचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर पुन्हा गेल्या काही महिन्यांपूर्वी याच दुकानात खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकाने आपल्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित युवक गंभीर जखमी झाला होता.
विशेष म्हणजे या दुकानांमध्ये चहा-नाष्ट्याला तसेच खरेदीसाठी थांबणारे सर्रास ग्राहक हे महामार्गावरच वाहने उभी करत असल्याने विरमाडे गावातील ग्रामस्थांना महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतोय. त्यामुळे संबंधित दुकानासमोर थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांनी महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवावे, अशी मागणी होत आहे.
आनेवाडी आणि विरमाडे या दोन्ही गावांच्या हद्दीत असणाऱ्या टोलनाका परिसरात अनेक स्थानिक तसेच इतर ठिकाणाचे व्यावसायिक व्यवसाय करत आहेत.
मात्र, विरमाडे गावच्या अगदी प्रवेशद्वाराला लागूनच एक दोन वर्षांपूर्वी नव्याने एक नामांकित खाद्यपदार्थाचे दुकान उभारण्यात आले होते. या व्यावसायिकाने आता आपला विस्तार चांगलाच वाढवला आहे. संबंधित व्यावसायिकाने गावातीलच एका शेतकऱ्याची शेतजमीन शेतीसाठी भाडेतत्वावर घेऊन त्याठिकाणी हा व्यवसाय सुरु केला. मात्र, या व्यावसायिकामुळे आता ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
याशिवाय अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. संबंधित दुकानामध्ये खाद्यपदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असून याठिकाणी येणारे ग्राहक आपली चारचाकी वाहने सर्रास महामार्गावरच उभी करत आहेत. त्यामुळे गावातून येणाऱ्या वाहनधारकांना महामार्ग ओलांडताना टोल भरुन पुढे येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.
याशिवाय याठिकाणी थांबणाऱ्या ग्राहकांनी गावात जाणाऱ्या रस्त्याला अक्षरश: मुतारीचे स्वरुप प्राप्त करुन दिले आहे. त्यामुळे गावात जाणाऱ्या ग्रामस्थांना प्रवेशद्वारावरच तोंडाला रुमाल लावून जावे लागत आहे. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाला ग्रामस्थांनी तोंडी बजावले असतानाही त्यावर कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महामार्ग, भुईंज पोलिसांची बघ्याची भूमिका
टोलनाक्यावर दररोज सकाळपासून महामार्ग तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे असे मिळून किमान आठ दहा पोलीस नियमित तैनात असतात. वाहने टोल भरुन पुढे आली रे आली की लगेच त्यांना अडवायचे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी कमी आणि चौकशीचा ससेमिरा वाहनधारकांच्या मागे लावत पावत्या फाडायच्या, अशी या पोलिसांची दैनंदिनी ठरली आहे. मात्र, याच वाहतूक पोलिसांना त्यांच्या डोळ्यासमोरच महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा पद्धतीने उभी केलेली वाहने दिसत नाहीत. किंबहुना त्यातील एकाही वाहनावर कारवाई करण्याचे धाडस या पोलिसांमधून केले जात नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिक आणि या पोलिसांचे नेमके कोणत्या प्रकारचे लागेबांधे आहेत याबाबत ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा सुरु आहे.