राजेशाही गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
कुडाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवास स्थानावर झालेल्या बैठकीत थेट अध्यक्षपदाची मागणी करून राजकीय महत्वाकांक्षा दाखवून दिल्या. पवारांची अध्यक्षपदाची मागणी व शिवेंद्रराजेंची रामराजेंशी कमराबंद चर्चा या घटना तासाभराच्या फरकाने घडल्याने या घटनांचा अन्वयार्थ जोडला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या सूत्रांनी या शक्यतांचा इन्कार केला आहे.
सातारा – सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरायचे संकेत मिळाल्याने भाजप व राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने आले आहेत. मात्र साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी शासकीय विश्रामगृहात चर्चा केल्याच्या वृत्ताने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, ही एक अनौपचारिक भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीचे सातत्याने राजकीय साद पडसाद उमटत आहेत.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्यासाठी राजकीय समतोल व प्रशासानाभिमुख कामाकाजासाठी राष्ट्रवादीला मुरब्बी राजकीय नेतृत्वाची गरज आहे. इच्छुकांच्या तुलनेत विद्यमान सभापती संजीवराजे यांचेच पारडे जड असल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर शनिवारी सकाळी आधी जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला व दुपारी शासकीय विश्रामगृहावर तळ देऊन होते. दुपारी दोनच्या दरम्यान भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रामराजे यांची विश्रामगृहाच्या अँटी चेंबरला भेट घेतली.
यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. जवळपास पंधरा मिनिटे खलबते झाल्याचे वृत्त आहे. सातारा विधानसभा मतदार संघाचे राजकीय संदर्भ बदलले तरी शिवेंद्रराजे व रामराजे यांचा स्नेहबंध बळकट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही केवळ अनौपचारिक गप्पा झाल्याची माहिती मिळत आहे.
तरीही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने काही खलबते झाली का? याचाही राजकीय संदर्भ दिवसभर शोधला जात होता. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भाजपवासी झाले व भाजप मेगा भरतीत पुनर्वसनाच्या सर्व राजकीय शक्यता तपासणारे रामराजे नाईक निंबाळकर संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादीशी फटकून राहिले. या घडामोडी फार जुन्या नाहीत, मात्र आज विश्रामगृहावर रामराजे व शिवेंद्रराजे यांच्या एकत्रित झालेल्या स्नेहभोजनाची जोरदार चर्चा झाली. भोजनाच्या निमित्ताने कोणत्या राजकीय विषयावर गप्पांचा फड रंगला? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.