टाकळी ढोकेश्वर -करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यातच लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याच्या अफवा वाढत असल्याने मराठवाड्यासह विदर्भातील मजुरांनी आपला पायी मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यामुळे ओतूर, आळेफाटा, बोरी, वडगाव कांदळी, राजूरी (जि. पुणे) येथून मजुरांचे लोंढेच्या लोंढे रखरखत्या उन्हात पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून पायी प्रवास करताना दिसत आहेत.
लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यातच लॉकडाऊन वाढण्याच्या अफवा येत असल्याने या मजुरांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला आहे. टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथून नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाने दररोज किमान पन्नासहून अधिक मजुरांचे लोंढे मराठवाडा, विदर्भातील आपल्या मूळ गावी पायी निघालेले पहावयास मिळत आहेत. रस्त्याने जाताना नगर जिल्ह्यातील अनेक दानशूर मंडळी माणूसकी जपत या मजुरांच्या नाश्त्यासह अन्न-पाण्याची सोय करत आहेत. उपासमारीमुळे कुटुंबाचे हाल होवू लागल्याने गावाकडचा रस्ता धरला आहे. रोजगार नसल्याने इथे थांबून तरी काय करणार? असा सवाल हे मजूर करत आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, ओझर, ओतूरसह परिसरातून अनेक मजुरांचे लोंढे पारनेरमधून जात आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाला या मजुरांचे लोंढे थांबविण्यात अपयश आलेले आहे, हे नक्की.
पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून हे मजूर पायी जात असताना दिसताच आमदार नीलेश लंके, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पारनेरच्या प्रशासनाने या मजुरांची सुपा, निघोज, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, जवळा आदी ठिकाणी निवारा केंद्रांत सोय केली असून, चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय केली आहे. काही मजूर रस्त्याने न जाता जंगलातून रस्ता दिसेल त्या मार्गाने हजारे मैल प्रवास करून आपापल्या गावी पोहोचले असल्याचेही निवारा केंद्रांतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून समजते. आ. दररोज दीड ते दोन हजार मजुरांना चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.
त्यासाठी प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते दादा शिंदे, सरपंच राहुल झावरे, संदीप सालके, बाळू दळवी, संतोष ढवळे, भाऊ साठे, अरुण पवार, संदीप थोरात यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
जिल्हा बंदी असताना हे मजूर येतातच कसे उपासमारीची वेळ आल्याने हे मजुरांचे लोंढे आपल्या गावांकडे जात आहेत. मात्र जिल्हा बंदी असताना पुणे जिल्ह्यातून हे मजूर नगर जिल्ह्यात प्रवेश कसा करतात, तसेच पुणे जिल्ह्यातून या मजुरांना जाणीवपूर्वक हाकलून तर दिले जाते नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.