पुणे-लोणावळा मार्ग : अडीच दशकांपासून केवळ चर्चाच
लोहमार्ग विस्तारीकरण फक्त सर्वेक्षणापुरतेच
पिंपरी – गेल्या अडीच दशकांपासून प्रवाशांची वाढती संख्या पाहून पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोहमार्ग विस्तारीकरणाच्या चर्चा होत आहेत. तीन पदरीचे सर्वेक्षण झाल्यानंतर चार पदरीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली जाते, परंतु सर्वेक्षणापुढे हे काम सरकतच नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महत्वाचा असलेला पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरण प्रकल्प सर्वेक्षणाच्या प्रक्रियेतच अडकलेला आहे. याआधी तीन पदरी लोहमार्ग विस्तारीकरणाचा आराखडा रद्द करुन त्याजागी चौपदरीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. यामुळे विस्तारीकरणाचा प्रकल्प सर्वेक्षणापुरताच आहे की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सध्या लोकलने सुमारे एक लाख प्रवासी रोज प्रवास करतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आणखी एक लोकल द्यावी व फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
तर फेऱ्या वाढविता येतील
पुणे लोणावळा या मार्गावर लोकल आणि एक्सप्रेसच्या दिवसातून 124 फेऱ्या होतात. लोकलला बाजूला थांबवून एक्सप्रेसला प्राधान्य दिले जात असल्याने लोकलचा वेळ वाढतो आणि फेऱ्याही कमी होतात. फेऱ्या वाढविण्यासाठी एखादा जरी ट्रॅक उपलब्ध झाला तरी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. परंतु, ट्रॅक वाढविण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्यामुळे ट्रॅक वाढविण्यात अडचणी येत आहेत.
या अडचणी दूर होणे गरजेचे
एक्सप्रेसच्या तुलनेत लोकल ही वजनाने हलकी असल्यामुळे जलद वेग पकडू शकते. ताशी शंभर किमीच्या वेगाने धावू शकते. परंतु आपल्याकडील ट्रॅक हे वळणावळणाचे असल्यामुळे लोकलला वेग पकडता येत नाही. रेल्वे स्टेशनजवळील पिंपरी, चिंचवड, शिवाजीनगर रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या उठवून त्यांना दुसरीकडे जागा दिली तर त्याठिकाणी ट्रॅक टाकला जाऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी झोपडपट्ट्या हटत नाहीत. रेल्वेचे रुळ अंथरुन तिसरा आणि चौथा ट्रॅक निर्माण करणे ही सर्वात शेवटची पायरी आहे. रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे हटविली पाहिजेत. दापोडी, आकुर्डी या ठिकाणी ट्रॅक टाकण्यासाठी अडचणी आहेत. आकुर्डी रेल्वे स्टेशन हे खूप उंचावर आहे, तिथे भर टाकावी लागेल. दापोडी व आकुर्डीचे प्लेटफार्म तोडावे लागतील, अशा अनेक अडचणी आहेत.
अडीच हजार कोटींचा खर्च
दोन वर्षांपूर्वी तीनपदरी लोहमार्गाचा अहवाल रेल्वे बोर्डाने मंजूर केला होता. मात्र, ऐनवेळी चौपदरी विस्तारीकरणाचा आराखडा समोर आला आणि सुरु होणारे काम रखडले. आता पुन्हा चौपदरी लोहमार्गासाठी सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, या प्रकल्पाला जमिनीचा परतावा वगळता अडीच हजार कोटी पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या ताब्यात असलेली जमीन व इतर संपादित करावयाची जमीन हा प्रश्न सुद्धा मोठा आहे. यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेने काही मदत करावी, अशी अपेक्षा होती. मात्र, हाती निराशा लागल्याने आता राज्य सरकार आणि रेल्वेला हा खर्च करावा लागणार आहे.