वारंगल (तेलंगणा) – तेलंगणातील वारंगल येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. छोटू असे या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी काझीपेठ रेल्वे स्थानक परिसरात घडली.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 8 वर्षीय मुलाचे आई-वडिल उदरनिर्वाहाच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातून तेलंगणामध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगाही होता. शुक्रवारी सकाळी काझीपेठ रेल्वे स्थानकावर शौचालयासाठी त्यांचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, गेल्या फेब्रुवारीमध्ये तेलंगणामध्ये एका चार वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या एका वेदनादायक घटनेने संपूर्ण तेलंगणात हाहाकार माजवला होता.