मुंबई – राज्याच्या कमाल तापमानात चढउतार सुरू असताना उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. कमाल तापमानात चढउतार कायम राहण्याची शक्यता असून पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यासह देशात अनेक राज्यांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. दरम्यान राज्यात विदर्भ, आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमानही 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान कमी असले तरी आर्दता अधिक आहे.
परिणामी, उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. विदर्भातील अमरावती व वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 42.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान होते.
मान्सून कधी?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अंदमान बेटांवर वातावरण पोषक असून उद्यापर्यंत (20) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरात समुद्रसपाटीपासून 900 मी उंचीवर चक्राकार वारे सक्रीय असल्याने मध्य प्रदेश, विदर्भ ते तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे केरळात मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांतील कमाल तापमान
पुणे 38.5 (23.4), जळगाव 40.5, धुळे 40, कोल्हापूर 37.6 (22.6), महाबळेश्वर 32.9 (19.2), नाशिक 37 (22.1), निफाड 38.6 (23.8), सांगली 39.2 (22.9), सातारा 39.4 (22.2), सोलापूर 40.7 (26.2), सांताक्रूझ 33.2 (26.6), डहाणू 34 (27.4), रत्नागिरी 34.6 (26.5).