मुंबई : मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण व अभिरुचीसंपन्न असल्याचे आपण पाहिले आहे. हे समृद्ध साहित्य व लेख हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच मुंबई हिंदी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सन 1944 साली सुरु झालेल्या मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुंबई हिंदी सभेचे कुलपती तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय हिंदी संचालनालयातील उपसंचालक राकेश शर्मा, पत्रकार वर्षा सोळंकी, सभेचे कुलगुरु विजय परदेशी, महासचिव सूर्यकांत नागवेकर व कोषाध्यक्ष देवदत्त साळवी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, स्वामी विवेकानंद बंगाली भाषिक असले तरीही ते शिकागो येथे उत्कृष्ट इंग्रजी भाषेत बोलले व अल्मोडा येथे आले असताना लोकांशी हिंदी भाषेतून बोलले. महर्षी दयानंद यांनी देखील हिंदी भाषेत काम सुरु केले. महात्मा गांधी यांनी देशाला जोडण्यासाठी हिंदुस्तानी भाषेचा पुरस्कार केला, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे सांगताना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचे योगदान कितीतरी पटीने मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली पाहिजे, मात्र मराठी येत नसेल तर हिंदी बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते हिंदी भाषा प्रचार-प्रसाराकरिता समर्पित निवडक लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.