वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील काशी तामिळ संगम कार्यक्रमात तामिळनाडूतील अभ्यागतांशी संपर्क साधताना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर केला आणि त्यातून त्यांच्या हिंदी भाषणाचा सुरूवातीचा भाग उपस्थितांना थेट ईअर फोन द्वारे तामिळी भाषेत ऐकता आला.
रविवारी कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, पंतप्रधानांनी श्रोत्यांना त्यांचे इयरफोन लावण्यास सांगितले, ते म्हणाले की आता या भाषणात एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे, त्यात आपल्या हिंदी भाषणाचे तामिळी भाषेत लगेच भाषांतर सादर केले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता लोकांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, हा माझा पहिला अनुभव आहे. भविष्यात, मी त्याचा अधिक वापर करेन आणि तुम्हाला त्या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून भाषांतराचा हा “प्रयोग” त्यांच्या भाषणाच्या पहिल्या काही मिनिटांसाठी होता. त्यांच्या भाषणाचा उर्वरित भाग व्यासपीठावरील दुभाष्याने तामिळमध्ये अनुवादित केला.
Kashi Tamil Sangamam is an innovative programme that celebrates India’s cultural diversity and strengthens the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat.’ @KTSangamam https://t.co/tTsjcyJspm
— Narendra Modi (@narendramodi) December 17, 2023
यावेळी पंतप्रधान म्हणाले, “तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून त्याच्या दुसऱ्या घरी येणे आहे. तसेच तामिळनाडूहून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीच्या ठिकाणाहून काशी विशालाक्षीच्या ठिकाणी येणे आहे.
तामिळनाडू आणि काशीच्या लोकांच्या हृदयात असलेले प्रेम आणि ऋणानुबंध वेगळे आणि अद्वितीय आहेत. मला खात्री आहे की, काशीचे लोक तुमच्या सर्वांच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाहीत. तुम्ही जेव्हा निघाल तेव्हा सोबत बाबा विश्वनाथांचे आशीर्वाद, काशीची चव, संस्कृती आणि आठवणीही तुमच्यासोबत घेऊन जाल, असे मोदी म्हणाले. काशी तमिळ संगम, उपक्रम जो १७ डिसेंबरपासून सुरू झाला तो या महिन्याच्या शेवटपर्यंत चालेल, त्यात तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील १४०० मान्यवरांचा सहभाग आहे.
या उपक्रमात सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांव्यतिरिक्त, तामिळनाडू आणि वाराणसीमधील कला, संगीत, हातमाग, हस्तकला, पाककृती आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची समृद्ध टेपेस्ट्री दर्शविणारे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, पर्यटन, रेल्वे, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, माहिती आणि प्रसारण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, तसेच उत्तरप्रदेश सरकारच्या विविध विभागांमार्फत एकत्रितपणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काशी तमिळ संगममध्ये साहित्य, प्राचीन ग्रंथ, तत्त्वज्ञान, अध्यात्म, संगीत, नृत्य, नाटक, योग आणि आयुर्वेद यांचा समावेश असलेली व्याख्याने असतील. याशिवाय, नवोपक्रम, व्यापार, ज्ञानाची देवाणघेवाण, एज्युटेक आणि नेक्स्ट-जेन टेक्नॉलॉजी या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत.