व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांवर परिणाम
पुणे – भारतामध्ये सामाजिक सुरक्षा कमी प्रमाणात आहे. अनेकजण व्याजावरील उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे ठेवीवरील व्याजदर कमी करण्यास मर्यादा असतात, असे स्टेट बॅंकेने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॅंकांनी ठेवींवरील व्याजदरात बरीच घट केली आहे.
स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिश कुमार म्हणाले, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा कोणी काही बोलत नाही. मात्र, जेव्हा व्याजदर कमी होऊ लागतात तेव्हा त्याबाबत चर्चा सुरू होते. भारतातील बॅंका भांडवलासाठी ठेविदारावर अवलंबून असतात. तसेच, स्टेट बॅंकेतील 90 टक्के भांडवल हे रिटेल ठेविदाराकडून येते. जर कर्जावरील व्याजदर कमी करायचे असतील तर, ठेवीवरील व्याजदर कमी करावे लागतात. मात्र, भारतामध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून बॅंकात ठेवी ठेवल्या जातात. त्यांना ठेवीवरील व्याजाची गरज असते. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर विचार करून ठेवीवरील व्याजदर कमी करण्यास मर्यादा येतात, असे ते म्हणाले.
सध्या भारतात सर्वसाधारणपणे ठेवीवर 3 ते 4 टक्के व्याज दिले जाते. तर बॅंका कर्ज घेणाऱ्यांकडून साधारणपणे 8 टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज लावतात. याचा अर्थ आम्ही कर्जावरील व्याजदर ठेवींवरील व्याजदर कमी केल्याशिवाय कमी करू शकत नाही आणि याला मर्यादा असतात. 6 वर्षांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेचे रेपो रेट वाढत होते, मात्र तरीही त्या प्रमाणात बॅंकांनी व्याजदरात वाढ केली नव्हती, याची आठवण त्यांनी करून दिली.