पुणे – गेल्या लोकसभा निवडणुकीत (2019) राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघात एकूण 867 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील केवळ 99 उमेदवारांना अनामत रक्कम वाचेल एवढी म्हणजे सुमारे 17 टक्के मते मिळाली. त्यात पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघातील आठ उमेदवारांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील 85 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
लोकसभा असो, की विधानसभा निवडणूक. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम म्हणेजच “अनामत रक्कम’ (सिक्युरिटी डिपॉझिट) जमा करावी लागते. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपये, तर एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये जमा करावे लागतात.
गेल्या लोकसभा निवडणुकीत (2019) राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर 1 हजार 332 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यात 1 हजार 211 पुरुष आणि 121 उमेदवारांचा समावेश होता. यापैकी 192 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद तर 273 जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात 867 उमेदवार होते. त्यातील केवळ 99 उमेदवारांना झालेल्या मतदानापैकी सुमारे 17 टक्क्यांपेक्षा कमी मतदान मिळाले. म्हणजेच या उमेदवारांनी आपली अनामत रक्कम परत मिळवली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघांमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 136 उमेदवारांना अर्ज दाखल केले. त्यातील 43 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे 93 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्यातील 85 उमेदवारांना डिपाॅजिटही गमवावे लागले. यामध्ये चारही लोकसभा मतदार संघांतील प्रत्येकी दोन म्हणजेच विजयी आणि दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपाॅजिट बाकी राहिले.
डिपॉजिट जप्त कधी होते ?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 1/6 म्हणजेच 16.67 टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. एखाद्या उमेदवाराला 16.67 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याचे डिपॉझिट त्याला परत केले जाते. एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाल्यास, डिपॉझिट परत दिले जाते. विजयी उमेदवारांना सुद्धा डिपॉझिट परत मिळते.