पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्ताला जोडणाऱ्या कुंटे चौकाजवळ लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर आहे. तुळशीबागेपासून आणि विश्रामबाग वाड्यापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेले तसेच अत्यंत गजबजलेल्या भागात हे मंदिर आहे. मात्र, मंदिर परिसरात आल्यावरच अत्यंत शांत वाटते. बाजीराव रस्त्यावरील सिग्नलला थांबले तरी तीन प्रशस्त दरवाजांचे आणि त्याला असलेल्या दगडी कमानींचे हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हे मंदिर “झांजले विठ्ठल मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते.
लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर पूर्णतः दगडात बांधलेले आहे. हे मंदिर सुमारे अडीचशे-तीनशे वर्षे जुने आहे. मंदिराचे सभागृह आणि गर्भगृह लाकडी आहे आणि मुख्य म्हणजे आजही सुस्थितीत आहे. मंदिराची इमारत तीन मजली पण जुन्या रचनेतील आहे. आजही येथे असलेली तीसऱ्या मजल्यावरील लाकडी गॅलरी जुन्या पुण्याची खरी ओळख करून देते. सभागृहामध्ये वरच्या बाजूला अशीच गॅलरी आहे. येथे प्रदक्षिणा मार्गासह प्रार्थनागृह आहे. मंदिराची इमारत जुनी असल्याने आता मंदिराची ओळख असलेले मूळ स्ट्रक्चर तसेच ठेवून जीर्णोद्धार सुरू करण्यात येत आहे.
मंदिरात दररोज सकाळी 8ची आणि संध्याकाळी 8 वाजताची आरती होते. नित्याचे सर्व पूजाउपचार होतात. आषाढी-कार्तिकी आणि वैकुंठ एकादशी येथे मोठ्या स्वरूपात साजरी केली जाते. यावेळी आणि शनिवारी तीन तास भजन होते. अश्विन ते कार्तिकदरम्यान काकडा आणि त्यानंतर अन्नकोट होतो. याचवेळी महिलांसाठी भोंडल्याचा मोठा कार्यक्रम घेतला जातो. चैत्र महिन्यात वासंतिक उटीचा मोठा कार्यक्रम होतो, याचवेळी द्राक्षमहोत्सवाचेही आयोजन केले जाते. दरवर्षी महिलांसाठी एक दिवसाची सहल काढण्याची प्रथा आहे. ज्येष्ठ शु.7 ला या मंदिराचा छबिना निघतो, त्यावेळी नगरप्रदक्षिणा केली जाते. या प्रदक्षिणा मार्गावर नऊ ठिकाणी अभंगांची परंपरा आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
स्थायी समितीचे पहिले अध्यक्ष
मंदिराचे तत्कालीन विश्वस्त हभप नारायण कृष्णाजी झांजले हे पुण्याच्या स्थायी समितीचे पहिले अध्यक्ष होते. हभप लक्ष्मण सटवाजी झांजले, कुशाबा लक्ष्मण झांजले अशी पिढींची येथे परंपरा असून आज आठव्या पिढीतील अखिल झांजले हे या मंदिराची व्यवस्था पाहत आहेत. या मंदिरात विश्वस्तांची परंपरा आहे. लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या देहू, आळंदी आणि मुंबईत धर्मशाळा आहे.
हभप लिंबराज महाराजांची समाधी
बीडचे हभप वै. लिंबराज महाराज यांचे वास्तव्य बरेच वर्षे येथे होते. हैबतबाबांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला, त्यावेळी त्यांच्याबरोबर खंडुजीबाबांसह असलेल्या सहकाऱ्यांबरोबर हभप लिंबराज महाराजांचीही समावेश होता. त्यामुळे मानाच्या दिंडी सोहळ्यात या मंदिरातील मानकऱ्यांचाही समावेश आहे. हभप लिंबराज महाराजांची समाधी या मंदिरात आहे. त्याभोवतीचा मंडप देखील सुबक लाकडात कोरलेला आहे.
जुन्या विहिरीचा आजही वापर
मंदिराच्या मागील बाजूला एक दगडी विहीर आहे. या मंदिराच्या पाण्याचा वापर मंदिर स्वच्छतेसह इतर गोष्टींसाठीही केला जातो.
शास्त्रीय गायक-नाट्य कलाकारांची मांदियाळी
20व्या शतकात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कृष्णराव मेहंदळे यांनी सुरू केलेले तीन तासांचे भजन दर शनिवारी आजही येथे आयोजित केले जाते. मास्टर कृष्णराव, नरहरबुवा पाटणकर, हिराबाई बडोदेकर आणि विनायकबुवा पटवर्धन यासारखे अनेक शास्त्रीय गायक तसेच बालगंधर्व, जयमाला शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यासारखे नाट्यसंगीत दिग्गज मंदिरातील पारंपरिक शनिवारच्या भजनाला हजेरी लावत असत. शास्त्रीय संगीतकारांना भक्तिगीतांशी जोडण्याची ही परंपरा वीणेकरी माधव लिमये आणि आनंद भाटे, अश्विनी टिळक आणि अतुल खांडेकर यासारख्या अनेक संगीतकारांनी आजही सुरू ठेवली आहे, जे आजही येथे भजनसेवा देतात.