संध्याकाळची वेळ होती. घरासमोरच्या अंगणात हवा खात बसलो होतो. तेव्हढ्यात शेजारच्या कुलकर्ण्यांचा किरण आला. माझ्या हातावर पेढा ठेवून पाया पडत मला म्हणाला, “काका मी इंजिनीअर झालो. आजच रिझल्ट लागला.’
“फारच छान, अभिनंदन हो तुझं.’ मी म्हणालो.
तो निघणार तेव्हढ्यात शेजारचे उदास आजोबा आले. चेहऱ्यावर नावाप्रमाणेच उदासी. किरणने त्यांनाही पेढा दिला.
“कसले रे पेढे’, आजोबांनी विचारले.
“आजोबा मी इंजिनीअर झालो’, किरण आनंदाने म्हणाला.
“हो का, जॉब कुठं मिळाला?’ आजोबांनी विचारलं.
“आजकाल ते काय कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन डिग्रीच्या आधीच नेमणुकीचं पत्र देतात ना. तुला कॅम्पसमध्ये जॉब मिळाला नाही वाटतं. आज-काल इंजिनीअर लोकांना जॉब मिळणं फारच अवघड झालयं. दोन-दोन, चार-चार वर्षे जॉबच मिळत नाही म्हणे. आणि मिळालाच तर फार काय तो पगार देत नाही. तेव्हा आता पहिला जॉब मिळव. मी आपला वडीलकीच्या नात्यानं सल्ला दिला हो.’ किरण बिचारा हिरमुसला होऊन निघून गेला. शिळोप्याच्या गप्पा मारून आजोबाही निघून गेले.
उदास आजोबा निघून गेल्यानंतर माझ्या मनात विचार आला. आजोबांनी केलं ते चांगलं केलं का? रिझल्टच्या दिवशी पेढे द्यायला आलेल्या व्यक्तीचा असा हिरमोड करणं कितपत बरोबर आहे. हे आजोबा कुठल्याशा सरकारी कार्यालयातून वरिष्ठ कारकून म्हणून निवृत्त झालेले, पण आल्या-गेल्याला सल्ला देणं आपलं पहिलं कर्तव्य समजतात. यांच्यासारख्या लोकांची एक सवय म्हणजे, मागितला असो वा नसो, आपला त्या गोष्टीशी संबंध असो किंवा नसो, सल्ला देत राहणे.
चार वर्षे इमान-इतबारे अभ्यास करून पदवी मिळवलेल्या सगळ्यांना लगेचच नोकरी लागते असे नाही. काहींच्या नशिबी ती लगेच असते तर काहींना नोकरीच्या प्रतीक्षेचीही परीक्षा पास व्हावे लागते. काहींना अपेक्षित पगार सुरुवातीपासूनच मिळतो तर बऱ्याच जणांना पात्रता असूनही कमी पगारात सुरुवात करावी लागते. थोड्या नशिबवानांना राहत्या शहरातच नोकरी मिळते तर बाकीच्यांना नोकरीसाठी घर-दार सोडावे लागते, पण नोकरी मिळाली तरी फुकटच्या सल्लागारांचे सल्ले संपत नाहीत.
मुलाला नोकरी मिळाली तरी रिकामटेकड्या सल्ला देणाऱ्या लोकांच्या भात्यात दुसरा बाण असतो. अहो नोकरी मिळाली पण छोकरीचं काय? आज काल लग्नाचा प्रश्न फार बिकट आहे. आज-काल तर म्हणे वर-पित्यालाच वधूपित्याच्या घराचे उंबरठे झिजवावे लागतात. आमच्या एका स्नेह्यांनी तर लोकांच्या रोजच्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून घरच बदलले. मुलगा असो किंवा मुलगी त्याच्या व तिच्या आई-वडिलांना काळजी ती असतेच. अशा चिंताग्रस्त पालकांना मात्र साऱ्या जगाकडून नानाप्रकारचे सल्ले न मागता मिळत असतात.
माझ्या ओळखीतल्या एकाचे लग्न 40व्या वर्षी झाले. पण ते स्वतः मात्र लग्नाच्या बाबतीत सर्वांना सल्ला देण्यात आघाडीवर. यांच्याकडे पूजा-अर्चा, गंडे-तोडे, साधू-भोंदू, मॅरेज ब्युरो यांच्या माहितीची पोतडी भरून वाहात असते आणि ते ती सतत विनाकारण उघडत असतात. पुष्कळांनी उपवर वा उपवधूला पाहिलेही नसते, त्यांच्या अपेक्षा माहीत होणं फारच लांब, पण मोफत देता येणारी एकच गोष्ट ते हिरीरीने पुढं होऊन न मागता देतात ती म्हणजे सल्ला.
नोकरी आणि छोकरी मिळाल्यानंतर, विवाह झाला की नवदाम्पत्याला अपत्य झाले की नाही यावर काहींचे बारीक लक्ष असते. माझ्या माहितीतले एकजण तर विवाहानंतर एखादे जोडपे भेटायला आले की पहिला प्रश्न, आता पेढे/बर्फी केव्हा देणार हाच विचारतात.लग्नानंतर जस-जसे महिने जाऊ लागतात तशी या मंडळींची चिंता वाढू लागते आणि मग अपत्यप्राप्तीच्या नाना उपायांचा खजिना ते त्या नवरा-बायकोच्या समोर उलगडायला लागतात. बिचारी महिला अपत्याबाबाबतच्या त्याच-त्याच प्रश्नांनी अर्धमेली होते, पण यांना त्याचे सोयरसुतक नसते. प्रत्यक्ष जीवनात असे दाम्पत्य आपापल्या-परीने प्रयत्न करीतच असते, पण बऱ्याचदा फुकटच्या सल्लागारांनी चार-चौघात अशा नाजूक विषयावर सल्ला दिल्यामुळे त्यांना मान खाली घातल्यावाचून पर्याय नसतो.आपल्या अशा सल्ल्याने एखाद्याच्या हृदयाला ठेचही लागू शकते हे ह्यांच्या मनातही येत नाही.
नोकरी, लग्न, अपत्य याशिवायही बऱ्याच गोष्टींवर सल्लागार मंडळी पुढं होऊन अधिकारवाणीने आपला सल्ला देतात. ज्यांनी आयुष्यात चहाचा ठेलाही चालवला नाही ते मोठं-मोठ्या उद्योगपतींना वर्तमानातल्या वाचकांची पत्रेद्वारा सल्ला देऊन आपली हौस भागवून घेतात. तर काही महाभाग ज्यांनी नगरपालिकेची निवडणूक जिंकणे तर सोडाच, पण लढवली नाही ते चार-चौघात मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे होते यावर भाष्य करून आपली मते जाहीरपणे मांडायला कमी करीत नाहीत. जगातल्या प्रत्येक विषयावर यांचा सल्ला तयार असतो. छोटा-मोठा विषय असा भेदभाव यांच्याकडे नसतो. साधी भाजी कुठून घ्यावी इथपासून ते बंगला विकत घेण्यापासून हर दर्द की दवा, माफ करा प्रत्येक गोष्टीसाठीचा सल्ला यांच्या हातचा मळ असतो. एखाद्या रोगावरचा इलाज डॉक्टरांपेक्षा यांना जास्त माहीत असतो.
मंडळी, असे म्हणतात.
कुठे काय बोलावे हे कळावे लागते,
कुठे काय बोलू नये हेही कळावे लागते,
पुष्कळदा काही न बोलणे हेच शहाणपणाचे असते आणि तेही कळावे लागते.
पण मोफतचे सल्लागार हे समजण्याच्या पलीकडचे असतात. मला वाटते आपण सर्वांनी आपले काम बरे आणि आपण बरे असे आचरण अनुसरावे. म्हणतात ना जिथे आपला शब्द खाली पडेल तेथे शहाण्या माणसाने तोंड उघडू नये आणि कुणालाही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. अरे हो, मी पण सल्ला तुम्हाला का देतोय. चकटफू आहे म्हणून तर नाही.
– विनायक ढवळे