यवत – दौंड तालुक्यातील काही गावातील स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना त्यांच्या हक्काचा मिळणारा मोफत तांदळात झोल करीत असल्याची तक्रार आल्यानंतर तहसीलदारांनी सहा रेशशनिंग दुकानदारांचे परवाने रद्द केले असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली आहे.
टी. के. तांबोळी (यवत, ता. दौंड), अशोक एकनाथ साळवे (मळद, ता. दौंड), शालन रामचंद्र टेकवडे (गोपाळवाडी, ता. दौंड), बबन जी. दरेकर ( गोपाळवाडी, ता. दौंड), मधुसुदन राधेश्याम लढ्ढा (दौंड) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राहक भांडार (सरपंच वस्ती, दौंड) असे परवाना निलंबित केलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांची नावे आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभर लॉकडाऊन घोषित केला असून या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा मोफत तांदूळ एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने मिळणार आहे. या मोफत तांदळाचे एप्रिल महिन्याचे वाटप दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानात सुरू आहे. मात्र दौंड तालुक्यातील काही गावातील स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना त्यांच्या हक्काचा मिळणारा मोफत तांदळात झोल करीत कमी देत असल्याबाबत काही दिवसांपूर्वी दैनिक ‘प्रभात’ने बातमी प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. नागरिकांनी दौंडचे तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत धान्य दुकानदारांची चौकशी केली असता सहा स्वस्त धान्य दुकानदार दोषी आढळून आले असून त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
नागरिकांच्या तक्रारीनुसार या धान्य दुकानदारांची तपासणी केली असता नागरिकांना धान्य कमी देणे, धान्याच्या साठ्यात तफावत, दप्तर तपासणीत अनियमितपणा यामध्ये धान्य दुकानदार दोषी आढळून आले आहेत. यापुढेही स्वस्त धान्य दुकानदारांबाबत तक्रारी आल्यास त्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले. या कारवाईमुळे धान्य वाटपात काळाबाजार करणाऱ्या धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले असून इतर स्वस्त धान्य दुकानदारांवर वचक बसणार आहे.