कोपरगाव – समाजकल्याणाची विचारधारा सोबत घेवून 1999 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. मागील काही वर्षांत पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 ला पक्ष पुन्हा सत्तेत आला असून, मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा लोककल्याणासाठी करून पक्षाची प्रतिमा उंचावणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे आ. काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीरही पार पडले. आ. काळे म्हणाले, मानवी रक्ताला पर्याय नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होत असून, रक्तदानाच्या माध्यमातूनच ही गरज भागवावी लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदानातून समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे ते म्हणाले.
करोना लढ्यात महिला डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचा यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये 135 दात्यांनी रक्तदान केले.