पाटण – सत्यजितसिंह फक्त माझा वारसदार नाहीत, तर सत्यजितसिंह माझ्या विचारांचाही वारसदार आहेत. जो विचार घेऊन मी गेली अनेक वर्षे पाटण तालुक्यात काम केले. तोच विचार घेऊन आज सत्यजितसिंह जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुया आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकवुया, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
गुजरवाडी (म्हावशी) ता. पाटण येथील विविध विकासकामांचा भुमिपुजन व उद्घाटन सोहळा सातारा जिल्हा मध्य. सह. बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी येथील गावकऱ्यांच्या हस्ते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. पाटणकर म्हणाले, गुजरवाडी गावातील गावकऱ्यांनी मला दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येणाऱ्या काळात हिच एकता टिकवून पाटण तालुक्यात परिवर्तन घडवून आणा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच सत्यजितसिंह माझ्या विचारांचा आदर्श घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत विकासकामे पोहचवत आहेत. आपण सर्वांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना ताकद दिली पाहिजे. त्याचबरोबर मुंबई-पुणेकरांनी गावाकडे आल्यावर गावातील विकासकामे करणाऱ्या नेतृत्वाला ताकद द्यावी. गावागावात भांडणे लावणाऱ्या, तरुणांची माथी भडकवणाऱ्या, तरुणांना व्यसनी बनवण्याऱ्या तथाकथित नेत्यांना गावापासून दूर ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, माजी पं.स. सदस्य सौ. उज्ज्वला लोहार, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, पाटण अर्बन बॅंकेचे संचालक दिनकरराव घाडगे, अविनाश घाडगे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हिंदुराव सुतार, सरपंच शंकरराव घाडगे, उपसरपंच सर्जेराव घाडगे, विलासराव घाडगे, वाय.के. घाडगे, अधिक चव्हाण, राजाराम मोळावडे, संदीप लोहार, शंकर पवार, तुकाराम पवार, रामचंद्र पवार, तुकाराम किसन पवार, रामचंद्र धोंडी पवार, नथुराम पाबळे, शिवाजी चव्हाण, विठ्ठल पवार, तसेच प्रमुख मान्यवर, म्हावशी-गुजरवाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.
तरुणांनी पर्यटन व्यवसायाकडे वळावे
पाटण तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पाटण तालुक्यात चालना मिळेल. त्यादृष्टीने तालुक्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायाकडे वळले पाहिजे, असेही आवाहनही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी तरुणांना केले.
विकासकामांमागे पळणारा नेता योग्य
सध्या राजकारणाचा बाजार झाला आहे. तो थांबवला पाहिजे. जे स्वतःच्या पक्षाचे, नेत्यांचे झाले नाहीत; ते जनतेचे काय होणार? असा सवाल उपस्थित करत जनतेसाठी विकासकामांच्या मागे पळणारा नेता योग्य असतो. 50 खोक्यांच्या मागे पळणारा नाही, असा टोमणाही माजी मंत्री पाटणकर यांनी नाव न घेता विरोधकांना मारला.