कात्रज, दि. 26 (प्रतिनिधी) – कात्रजपासून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. डांबर शिंपडून खड्डे बुजविण्यात आले होते. पावसामुळे हे खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. मनपा पथविभागाकडून खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कात्रज चौक पीएमपीएल बसस्थानकापासून संतोषन गर लेन नं.7 पासून पुढे दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच महिन्यांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, पाऊस झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भरण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यामधील ड्रेनेज झाकणांशेजारी खड्डे पडून ड्रेनेज झाकणे धोकादायक झाली आहेत.
जैन आगम मंदिरकडील रस्त्यावरून उताराने सांडपाणी रस्त्यावर थेट वाहून येत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे असे खड्डे धोकादायक झाले आहेत. त्यातच या रस्त्याच्या दोन्हीही बाजूला अनेक छोटी-मोठी दुकाने असल्याने अनेक दुचाकी व चार चाकी गाड्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली असतात. यामुळेही दररोज सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी होत आहे.