चेन्नई – देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही भूमिका पार पाडण्यास आपण तयार आहोत असे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे. काही मुस्लिम धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या अशांततेच्या वातावरणात शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रजनीकांत यांना केले. त्यानंतर ट्विटरवर आपण त्यासाठी कोणतीही भूमिका स्वीकारण्यास तयार आहोत असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.
देशात प्रेम, शांतता आणि ऐक्य कायम राखण्याची गरज आहे अशी भावना मुस्लिम धर्मिय नेत्यांनीही व्यक्त केली आहे. त्यांच्या भावनेशी मी पुर्ण सहमत आहे असे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडू जमात उल उलमा सबई या संघटनेच्या प्रतिनिधींनी रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. गेल्या आठवड्यात रजनीकांत यांनी दिल्ली दंगलीबद्दल केंद्र सरकारवर टीका केली होती. दिल्लीतील दंगल शांत करता येत नसेल तर राजीनामा देऊन घरी जा अशा शब्दात रजनीकांत यांनी सरकारला समज दिली होती.