नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान परंपरागत प्रतिस्पर्धी संघात आखातातील शारजा येथे होणारे क्रिकेटचे सामने मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे थांबले होते. आता जवळपास दोन दशकांनंतर शारजात क्रिकेटचे वारे वाहणार आहेत. याच दोन संघांचा सहभाग असलेल्या टेनिसबॉलच्या विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे.
येत्या 8 मार्चपासून शारजा क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत असून त्यात 11 मार्चला साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विश्वकरंडक तसेच अधिकृत स्पर्धांमध्येच केवळ भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी खेळतात.
शारजात 20 वर्षांनी या संघात सामना हेणार आहे. 2000 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारत व पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, त्यानंतर आयसीसी स्पर्धा वगळता अन्य कोणत्याही स्पर्धेत हे संघ समोरासमोर आलेले नाहीत.
या आधी टेनिस बॉलच्याच क्रिकेट स्पर्धेत या दोन संघांत 2014 साली सामना झाला होता. तसेच 19 वर्षांखालील हे संघ आशिया करंडकात खेळले होते. टेनिस बॉल विश्वकरंडक स्पर्धेत यंदा 20 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील सामने 10 षटकांचे होतील.