चाफळ – चाफळ विभागातील पाडळोशी, तावरेवाडी, मसुगडेवाडी, नारळवाडी परिसरात बिबट्याच्या जोडीचे दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला असल्याने बिबट्यांच्या भीतीने ग्रामस्थांनी जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने याठिकाणी सापळा लावून सदरच्या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळोशीसह नजीकच्या चारही वाड्यांमध्ये काही दिवसांपासून दोन बिबटे शिवारात फिरत आहेत. त्यामुळे शेतकरी शिवारात जाणे टाळत आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेक जनावरे मारली गेली आहेत. काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने रस्त्याने एकटे जाणेही धोक्याचे बनले आहे. दोन बिबटे लोकवस्तीत येत असल्याने भीती व्यक्त होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळे लावून या बिबट्यांना पकडून इतरत्र सोडावेत, अशी मागणी जोर धरीत आहे.