पुणे -अभिनय शिकवला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणाऱ्या लोकांना वाचायला शिका. अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
“एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’तर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’चे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रसिद्ध क्रिएटीव्ह डायरेक्टर अभिजित पानसे, धिरज सिंग आणि दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा उपस्थित होते. “एनएसडी’चे प्रमुख पद्मश्री वामन केंद्रे यांनी स्कूलला शुभेच्छा दिल्या. तसेच पाटेकर यांनी वेबसाईट लॉन्च केली.
रोजच्या जीवनात सुख दु:खाची व्याख्या बदलली तरच सुखी रहाल. कठीण परिश्रमाच्या आजूबाजूला यश असते. जीवनात काहीच कठीण नाही त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा, असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी दिला.
संघर्षाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. परंतू भारतीय चित्रपटांवर आजही हॉलिवूडचा खूप मोठा प्रभाव दिसतो. बॉलिवूडवर पडलेली विदेशी छाप पुसायची आहे. त्यासाठी योग्य फिल्म स्कूलची आवश्यकता आज पूर्ण झाल्याचे पानसे म्हणाले. धिरज सिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.