पुणे – मागील शंभर वर्षांमध्ये यंदाच्या ऊस गाळप हंगामात सर्वाधिक 210 साखर कारखान्यांकडून गाळप करण्यात आले. राज्यातील 22 जिल्ह्यातील कारखान्यांकडून 1 हजार 52 लाख टन ऊसाचे गाळप केले. यातून 105 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा 10 टक्के मिळाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. सर्व साखर कारखान्यांनी मिळून 96 टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. आगामी काळातही राज्यातील साखर कारखानदारीचे भवितव्य उज्ज्वल राहणार असून, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मोठा उद्योग ठरणार आहे, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.
राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा (2022-23) गाळप हंगाम नुकताच संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त गायकवाड यांनी यंदाच्या हंगामाची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील अनेक साखर कारखाने साखरेच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस प्राधान्य देत आहेत. इथेनॉलच्या पुरवठ्यानंतर तेल विपणन कंपन्या एकवीस दिवसांत पैसे देत असल्याने साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा लाभत असून, पर्यायाने शेतकऱ्यांना वेळेवर रास्त व किफायतशीर दर मिळत आहे.
सर्वाधिक गाळप करणारे कारखाने
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस (जरंडेश्वर), जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, बारामती अग्रो, शेटफळ, इंडिकॉन डेव्हलपर्स.
सर्वाधिक साखर उत्पादित करणारे कारखाने
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस (जरंडेश्वर), विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, इंडिकॉन डेव्हलपर्स, तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना.
साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानी
राज्यात साखरेची वार्षिक गरज 35 लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे 105 लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी 23 लाख टन साखर निर्यात होत असून, पर्यायाने देशाच्या साठ लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.