मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना थेट शब्दात काही गोष्टी ऐकवल्यानंतर उपस्थितांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या गेल्या. अमित शहा यांना त्यांच्या सरकारमधील आक्षेपार्ह बाबींविषयी थेट प्रश्न विचारण्याचे धाडस बजाज यांनी दाखवल्याची बाब देशभरातील चर्चेचा विषय ठरली. कॉंग्रेस पक्षानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याचा उल्लेख करीत केंद्रावर निशाणा साधला. वास्तविक राहुल बजाज हे देशातल्या एका प्रमुख उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. उद्योग क्षेत्रातला माणूस सहसा सरकारशी थेट पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. त्या कार्यक्रमात राहुल बजाज जेव्हा अमित शहा यांना प्रश्न विचारण्यास उभे राहिले, त्यावेळी आर्थिक स्थितीबाबत किंवा औद्योगिक क्षेत्रातील मंदीच्या वातावरणाबाबत सरकारकडून ते काही अपेक्षा व्यक्त करतील किंवा काही मागण्या सादर करतील, असे वाटले होते. पण त्यांनी थेट साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे यांचे जे उदात्तीकरण केले त्याच विषयाला हात घातला.
“गांधीजींच्या मारेकऱ्यांना देशभक्त म्हटले जाते, तुम्ही अशा व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देता, त्यांना संसदीय समितीवरही नेमले जाते,’ असे नमूद करीत बजाज यांनी शहांनाच कोंडीत पकडले. “लोक तुम्हाला प्रश्न विचारायला घाबरतात. पूर्वी यूपीए सरकारच्या काळात सरकारवर कोणीही टीका करू शकत होते. पण आज ती स्थिती नाही. देशातील हे भीतीचे वातावरण कधी कमी होणार आहे,’ असे प्रश्न बजाज यांनी उपस्थित केले. देशात घडणाऱ्या “मॉब लिंचींग’च्या प्रकारांवरही त्यांनी यावेळी टीका केली. “देशातील उद्योगपती त्यांच्या साऱ्या समस्यांबाबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत,’ असेही त्यांनी अमित शहांना ऐकवले.
त्यामुळे कार्यक्रम स्थळी काहीसे गंभीर वातावरण निर्माण झाले होते. पण अमित शहा यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने त्यांची बाजू मांडली. “आज तुम्ही मला हे प्रश्न विचारले याचाच अर्थ लोक सरकारला प्रश्न विचारायला घाबरतात, हे खरे नाही,’ हे शहांनी नमूद केले. नंतर शहा यांनी साध्वींवर सरकारने काय कारवाई केली, वगैरे बाबींचेही दाखले दिले. पण शहा आणि बजाज यांच्यातील ही जुगलबंदी देशातील चर्चेचा विषय ठरली. बजाज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये बरेच तथ्य आहे. साऱ्या उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला सध्या एका अनामिक भीतीने ग्रासल्याचे वातावरण आहे. त्याचाच परिणाम आज असा होताना दिसत आहे की, संपत्ती निर्मितीचे काम करणारी मंडळी आज अंग चोरून वावरताना दिसतात. मोठमोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करून सरकारची आपल्यावर नाहक करडी नजर करून का घ्यायची, अशाच विवंचनेत गुंतवणूकदार आणि उद्योगपती आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दोन दिवसांपूर्वी हीच वस्तुस्थिती एका कार्यक्रमात स्पष्टपणे मांडली आहे. आज देशाचा विकास दर 4.5 टक्क्यांवर आला आहे. कोणत्याही क्षेत्रात मोठी गुंतवणूक होताना दिसत नाही. सक्तीच्या कारवायांमुळे लोकांच्या मनात एक भीतीचे जे वातावरण निर्माण झाले आहे त्यातून देशाला बाहेर काढल्याशिवाय संपत्ती निर्मितीच्या कामाला चालना मिळणार नाही, असे त्यांचेही म्हणणे पडले. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना किंवा सरकारच्या चुकांवर आसूड ओढणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई होत असल्याचे अनेक उदाहरणे देशात घडली आहेत. अगदी मोदींना थेट पत्र पाठवून तक्रारी करणाऱ्यांवर गुन्हेही नोंदवले गेले आहेत. सरकारकडून मिळालेली तुटपुंजी आर्थिक मदत निषेध म्हणून मनिऑर्डरने पंतप्रधान कार्यालयाला परत पाठवणाऱ्यांचीही पोलीस चौकशी केली गेली आहे.
या साऱ्या प्रकारांमुळे सरकारबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे खरे आहे. कला-संस्कृती-साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठांनी मध्यंतरी एकत्र येत हाच विषय उपस्थित करून सरकारला काही सूचना केल्या होत्या, तर त्या लोकांवर बिहारमध्ये थेट देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवण्याचा प्रकार घडला होता. हा गुन्हा नंतर नितीशकुमार सरकारने मागे घेतला, हा विषय वेगळा पण सरकारला कोणीही काही शिकवायला जायचे नाही; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात, हा संदेश या निमित्ताने संबंधितांपर्यंत व्यवस्थितपणे पोहचवण्यात आला. खरे पाहता, लोकांना मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळणे हेच लोकशाही व्यवस्थेचे मुख्य मूलतत्त्व आहे. पण त्यालाच जर तिलांजली मिळत असेल, तर त्या मुस्कटदाबीलाही प्रभावीपणे वाचा फोडली गेली पाहिजे. राहुल बजाज यांनी हा प्रयत्न केला आहे. त्याचे त्यांना नेमके काय परिणाम भोगावे लागतील, हे यापुढील काळात दिसेलच. पण बजाज यांनी मात्र आपण टिपीकल व्यावसायिक गणित जपणारे उद्योगपती नाही आहोत, हे दाखवून लोकांची प्रशंसा मिळवली आहे हे मात्र निश्चित.
म. गांधी यांचे सहकारी राहिलेल्या जमनालाल बजाज यांचे ते वारसदार आहेत. त्यामुळे बजाज घराण्याला केवळ उद्योजक म्हणून महत्त्व नाही तर गांधींचा समर्थक परिवार म्हणूनही त्यांचा लोकांमध्ये आगळा मान आहे. म. गांधी यांच्या विचार परंपरेशी जोडला गेलेला माणूसच सत्ताधाऱ्यांना धाडसाने काही विचारू शकतो. अन्यथा पोटभरू उद्योगपतींनी असे धाडस दाखवले नसते. त्याच कार्यक्रमात शहा यांनी तोंडदेखले का होईना “सरकारला कोणी घाबरण्याचे कारण नाही,’ असे विधान करून लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. “आजही अनेक वृत्तपत्रांमधून आणि माध्यमांमधून मोदींवर टीका सुरूच असते,’ असेही शहांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.
या साऱ्या प्रकारावर आज अर्थमंत्री सीतारामन यांचेही वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी अपेक्षेप्रमाणे शहा यांनी बजाज यांना दिलेल्या उत्तराचे समर्थन केले आहे. मात्र हे करताना निर्मलाबाईंनी बजाज यांना अपत्यक्षपणे सूचक सल्लाही दिला. “आपला जो समज झाला आहे तो व्यक्त करण्याने देशाचे हित धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्याची गरज,’ त्यांनी बजाज यांना उद्देशून व्यक्त केली आहे. आज बजाज धाडसाने उभे राहिले, उद्या अशाच अन्य दिग्गज व्यक्ती धाडसाने बोलण्यास पुढे आल्या तर त्यालाही तोंड देण्यासाठी सरकारला आता सज्ज राहावे लागेल, असे दिसते आहे.