नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, बुलेट ट्रेन प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाची भरपाई महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून होवू दिली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसाच्या कार्यकाळात चाळीस हजार कोटी रुपये केंद्राकडे वळते केले असल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या खासदाराने केला आहे. याबाबत विचारले असता राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला जपानच्या कंपनीने कर्ज दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राकॉंचे सरकार आले आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आधीपासून या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. आता त्यांचे सरकार या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुलेट ट्रेनवर होणारा खर्च जनतेच्या खिशातून काढला जाणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केले होते.
राऊत म्हणाले, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशात, बुलेट ट्रेनवर पैसा खर्च करण्याऐवजी तो शेतकऱ्यांवर खर्च केला जाईल. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर 40 हजार कोटी रुपये वळते केले असेल तर या मुद्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुख्य सचिव जनतेला माहिती देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.