देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर या निकालांची दखल निश्चितच सर्व संबंधित राजकीय पक्षांना घ्यावी लागणार आहे. विशेषत: या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सत्ता राखणाऱ्या भाजपाचे यश आणि पंजाबमध्ये कॉंग्रेसची दीर्घ सत्ता बाजूला सारून नव्याने सत्तेवर येणारा आम आदमी पक्षाचे यश निश्चितच विशेष दखलपात्र आहे. अर्थात भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्या यशाची दखल घेत असतानाच दुसरीकडे देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या अपयशाचीही दखल घ्यावी लागणार आहे. या पाच राज्यांपैकी फक्त पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती आणि इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. निवडणुकीच्या निकालावर नजर टाकता भाजपाने आपल्या चारही राज्यांमधील सत्ता राखली आहे; कॉंग्रेसला मात्र आपली सत्ता गमवावी लागली आहे, तीसुद्धा आम आदमी पार्टीसारख्या एका नव्याने स्थापन झालेल्या पक्षामुळे.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रात स्थापन झाल्यापासून देशात सर्वत्र आपली सत्ता असावी याच दिशेने भाजपचा कारभार चालू असल्याने त्यांनी अनेक नव्या राज्यांत सत्ता स्थापन केली आणि जुना राज्यांतील सत्ता टिकवलीसुद्धा. या वेळी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा उत्तर प्रदेशमधील सत्ता टिकवते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर उत्तराखंड आणि गोव्यामध्येसुद्धा भाजपला आव्हान निर्माण होते का, याबाबत चर्चा झाल्या होत्या; पण भाजपने सर्व शंका आणि चर्चांना पूर्णविराम देऊन उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने निश्चित पावले टाकली आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये काही जागांचा फटका बसला एवढी एकच टीका भाजपच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील यशावर करता येऊ शकते; पण दुसरीकडे गोव्यातील आपले यश मात्र भाजपाने चढत्या क्रमाने वाढवले आहे.
गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या जागांमध्ये या वेळी वाढ झाली आहे हे यश निश्चितच दखलपात्र असे मानावे लागते. अर्थात, भाजपच्या या यशापेक्षाही या निवडणुकीनंतर सर्वात जास्त दखल घ्यावी लागणार आहे ती आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मिळविलेल्या यशाची. राजकारणातील सर्वात कमी वय असलेला पक्ष म्हणून ज्या पक्षाची गणना केली जाते त्या आम आदमी पक्षाने आता दिल्ली विधानसभेनंतर पंजाब विधानसभेवर सुद्धा सत्ता स्थापन केल्याने सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या या राजकीय वाटचालीची दखल अतिशय गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टीने गोव्यामध्येसुद्धा निवडणूक लढवली होती आणि गोव्यासारख्या परक्या राज्यामध्येसुद्धा आम आदमी पार्टीचे दोन आमदार निवडून आले आहेत हे सुद्धा लक्षणीय यश मानावे लागणार आहे.
117 जागांच्या पंजाब विधानसभेमध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त जागा जिंकून आम आदमी पार्टीने एकाच वेळी कॉंग्रेसला पराभूत करताना भाजपासारख्या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षालाही इशारा देण्याचे काम केले आहे. दिल्ली विधानसभेतील यशापासून आम आदमी पक्षाने जी आपली वाटचाल चालू ठेवली आहे त्याची एक निश्चित अशी दिशा असल्याने त्यांना निवडणुकीच्या राजकारणातही असे लक्षणीय यश मिळत आहे. दिल्लीच्या विधानसभेतून त्यांनी कॉंग्रेस आणि भाजपाला बाजूला केले आणि आता पंजाबसारख्या राज्यामध्ये कॉंग्रेसला बाजूला करून या राज्यामध्ये सत्ता मिळवली आहे. दिल्ली, पंजाब, गोवा, उत्तराखंड यासारख्या छोट्या राज्यांमध्ये केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागून सत्ता स्थापन करण्याची आम आदमी पक्षाची ही रणनीती निश्चित सर्वच राजकीय पक्षांना लक्षात घ्यावी लागणार आहे. अर्थात उत्तराखंड आणि गोव्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाला यश मिळाले नसले तरी त्यांनी या दोन राज्यांमध्ये आगामी काळात चांगले यश मिळवण्यासाठी तयारी केली आहे, असा अर्थ सुद्धा या निकालांवरून समोर येत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये कॉंग्रेस आणि भाजप यांच्याशिवाय जो एक तिसरा पर्याय निर्माण केला आहे तो निश्चितच लक्षणीय मानावा लागेल. देशात तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची भाषा करणाऱ्या सर्वच प्रादेशिक पक्षांना आम आदमी पक्षाच्या या यशाची दखल घ्यावी लागणार आहे. आम आदमी पक्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि गेले कित्येक वर्षे निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनासुद्धा जे यश आजपर्यंत प्राप्त झाले नाही ते यश आम आदमी पार्टीला मिळाले आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यासाठी गोवा हा अतिशय जवळचा प्रदेश असूनही या दोन्ही पक्षांना या राज्यामध्ये नोटापेक्षाही कमी मते मिळाली असतानाच त्याच राज्यामध्ये दिल्लीसारख्या दूरच्या प्रदेशातून आलेल्या आम आदमी पार्टीने दोन ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणावेत हे लक्षणीय आहे. कोणत्याही जातीपातीच्या किंवा आरोप-प्रत्यारोपाच्या किंवा उत्तर-प्रत्युत्तराच्या राजकारणात न अडकता केवळ विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून सत्ता मिळवण्याची ही आम आदमी पक्षाची रणनीती सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावी अशी आहे.
एकीकडे आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्या यशाची अशी दखल घेत असतानाच दुसरीकडे कॉंग्रेससारख्या देशातल्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे निवडणुकीच्या राजकारणातील अपयशही लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे मानावे लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाच्या झंझावातामुळे देशातील अनेक राज्यांमधील कॉंग्रेसची सत्ता गेली होती. आता पंजाबसुद्धा कॉंग्रेसने गमावला आहे. ऐन निवडणुकीपूर्वी पंजाबमधील कॉंग्रेस पक्षाने ज्या प्रकारचे पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण बघितले आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारख्या बोलभांड नेत्याने ज्या प्रकारची विधाने करून चुकीचे राजकारण केले त्याचा फटका निश्चितच या पक्षाला बसला, असे म्हणावे लागते. उत्तर प्रदेशसारख्या देशाचा पंतप्रधान ठरवणाऱ्या मोठ्या राज्यामध्येही कॉंग्रेसला मोजून जवळपास तीन जागांवर विजय मिळवला आहे.
ज्या राज्यामध्ये एकेकाळी दीर्घकाळ कॉंग्रेसची सत्ता होती त्या राज्यामध्ये आज दोन आकडी आकडासुद्धा ओलांडता येत नाही, यामागील कारण शोधावे लागेल. आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा एकदा पुनर्जीवित व्हायचे असेल तर आतापासूनच बोध घेऊन त्यांना रणनीती आखावी लागणार आहे. केवळ भाजपच्या किंवा आपच्या यशातील त्रुटी काढून काहीही साध्य होणार नाही. आपली पक्ष संघटना बळकट करून निवडणुकीच्या राजकारणात चांगले यश मिळवण्यासाठी आपण काय करतो आहोत, यावर लक्ष केंद्रित केले तर आगामी कालावधीमध्ये कॉंग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.