सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अभिप्राय अभियानामध्ये कार्यकर्त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे आपली जवाबदारी पार पाडावी. करोना निर्मूलनाचे कठीण उद्दिष्ट पार पाडण्यासाठी कामात कुठेही तडजोड करू नये, असे आवाहन सहकार पणन तथा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष येत्या 10 जून रोजी 22 व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे येथील राष्ट्रवादी भवनामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सचिन बेलागडे, दीपक साहेबराव पवार, सेवा दलाचे संघटक राजेंद्र लावंघरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शाफिक शेख, महिला आघाडी अध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, महिला आघाडी सरचिटणीस नलिनी जाधव, भरत देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, “करोना संक्रमणाच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्य आणि सर्वसामान्य जनता एका मोठया अग्निदिव्यातून जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने बांधिलकीची कामे पक्षाकडून केली जात आहेत.’ वर्धापनदिनानिमित्त आयोजित अभिप्राय संपर्क अभियानात जिल्हयामध्ये कार्यकर्त्यांनी तळमळीने काम करावे व आपल्याकडून झालेल्या कामाचा सविस्तर तपशील संपर्क अभियानात द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास पाच लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन जवळपास सहा महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार असल्याचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी सांगितले.