नगर – महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनेवरुन गुलमोहोर रोड परिसरातील रेणुका नगर, मधुबन कॉलनी, नरहरी नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास अखेर प्रारंभ करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात गाळ टाकण्यात येईल, असा इशारा मागील आठवड्यात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिला होता. त्याची आज गंभीर दखल घेण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप यांनी या भागातील प्रश्नासंदर्भात थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी चर्चा केली होती. मागील आठ दिवसांपूर्वी नगर शहरात धुव्वाधार कोसळलेल्या पावसाने सावेडी उपनगर पुरते झोडपले होते. त्यामुळे गुलमोहोर रोड, रेणुका नगर, कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते.
आमदार जगताप व आयुक्त मायकलवार यांनीही त्या वेळी परिस्थितीची पाहणी केली होती. तथापि, गाळ काढण्याचे काम प्रलंबितच होते. त्यामुळे बोरकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. बोरकर म्हणाले, “”दरवर्षी वरील परिसरात पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. त्यांची कल्पना महापालिका नेहमीच असते.
त्यांना यावेळी अगोदरच आठवण करुन दिली हेती. मात्र, त्यांनी त्याकडे दूर्लक्ष केल्याने यावर्षीही स्थानिक नागरीकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. पावसाच्या पाण्यात नाल्यामधील पाणी मिसळत असल्याने त्या घाण पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका अधिक वाढतो. हा हलगर्जीपणा नागरीकांच्या जीवावर बेतणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.”