रोहन मुजूमदार
विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि संसूचनाच्या साधनांचा जसा विकास झाला, तसा त्याचा मानवी जीवनावर परिणाम झाला. कृषी प्रक्रिया उद्योगावरही त्याचा परिणाम झाला. कृषी क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले. सुमारे 20 वर्षांपूर्वी परंपरागत शेती करणारा शेतकरी आता हायटेक शेती करू लागला आहे. शेती क्षेत्रात जे संशोधन होत आहे, ते आत्मसात करून शेतकरी त्याचा अवलंब करीत आहेत. भारतातील अनेक शेतकरी स्वतःही संशोधन करीत आहेत. अनेक शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून शेती करताना दिसतात. काही शेतकरी अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया व इस्रायल यासारख्या विकसित देशांना भेटी देऊन तेथील शेतीच्या विकासाचा आणि संशोधनाचा अभ्यास करीत आहेत. वर्षापूर्वी तृणधान्ये आणि कडधान्याचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणारा शेतकरी आज आधुनिक शेती करतो आहे. आज हॉट्रिकल्चर, सेरीकल्चर, फ्लोरीकल्चर अशा विविध क्षेत्रांत प्रवेश केला आहे आणि त्यात यशही मिळवलेले आहे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची संपूर्ण समृद्धी ही शेतीशी निगडित होती व आजही आहे या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती किंवा शेतीशी निगडित व्यवसायांशी जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रत्येक शेतकरी आधुनिकतेची कास धरू लागला आहे. शेती व्यवसायात यांत्रिक शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यातून प्रत्येक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहे. या संक्रमणावस्थेत यांत्रिक शेतीचा मानबिंदू ठरला तो ट्रॅक्टर. तर 2020च्या शतकातील शेतकरी टेक्नोसॅव्ही झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आपल्या देशाच्या लोकजीवनामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व अनाधिकाळापासून देण्यात आलेले असून मोहें-जो-दडो व हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात धान्याची कोठारे सापडलेली आहेत. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या या संस्कृतीमध्ये शेती व्यवसायाला महत्त्वाचे स्थान मिळालेले होते, हे त्यावरून सिद्ध होते. माणसाच्या जीवनमानात ज्या सुधारणा घडून आल्या त्यातूनच आजचा समाज निर्माण झालेला आहे हे नाकारता येत नाही. समाजाच्या जडणघडणीमध्ये कालच्या शेतीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे विसरून चालणार नाही.
शेतकऱ्यांच्या अंगणात दिसणाऱ्या खिल्लारी बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामे पारंपरिक पद्धतीने करण्यात जाणारा वेळ आणि त्यासाठी लागणारे कष्ट शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. बदलत्या काळात कमी-कमी वेळेत जास्तीतजास्त काम करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून साकार झाले. त्यामुळे ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा खरा मित्र संबोधला जात असून, त्याद्वारे शेतीची मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लहानशा खेड्यातही छोट्या शेतकऱ्यांच्या दारापुढे ट्रॅक्टर दिसण्याचे कारणही यांत्रिक शेतीला दिले जाणारे प्राधान्य हेच आहे.
उन्हाने तप्त झालेली कडक जमीन नांगरता नांगरता महिनाभराचा कालावधी शेतकऱ्यांना लागत होता. जमिनीचा पोत कडक असेल तर चार बैलांनी नांगरणी केल्याशिवाय शेतकऱ्याला गत्यंतर नव्हते. खाचखळग्यांची शेती सपाट करण्याचे कामही तेवढेच वेळखाऊ होते.
शेतकऱ्यांना यासाठी मोठे कष्ट उपसावे लागत होते. हे चित्र इतिहास बनले आहे. ट्रॅक्टरने शेती व्यवसायात मोठा बदल घडवून आणला आहे. आधुनिक शेती-तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती-तंत्रज्ञानाची साथ घेऊन या शेतीला शाश्वत बनविण्याकडे सध्या वळला असून त्यात तरुण शेतकरी आघाडावरीही आहेत.
शेतकऱ्यांच्या घराघरासमोर ट्रॅक्टर उभा दिसल्यास सधन आणि आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी अशी बिरुदावली सहज मनात येऊन जाते. खेड्यापाड्यात, डोंगर कपाऱ्यात ट्रॅक्टरचा घुमलेला आवाज शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करू लागला आहे. हजार लोकसंख्येच्या लहानशा खेड्यातही शंभरावर ट्रॅक्टर आढळून येतात.
बहुउपयोगी यंत्र-साधा नांगर, पलटी नांगर, पळी नांगर अशी यंत्रे जोडून शेतकऱ्यांना हवी त्या प्रकारात नांगरणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोटर, फण, फळी, पेरणी ही यंत्रे जोडून ट्रॅक्टरद्वारे बहुपर्यायी कामे करून घेतली जातात. जमीन सपाटीकरणासाठी फळी, तात्पुरत्या मशागतीसाठी फण आणि पेरणीसाठी पेरणी यंत्र जोडून कामे केली जातात.
आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आली आहे. प्रगतीचा विकास म्हणजे आधुनिकता. मग या आधुनिकतेत शेतकरीच का मागे सारावा. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि जवळजवळ 70 टक्के लोक ही शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. सध्याच्या काळात आधुनिक तिकडे आणि नवनवीन यांत्रिकीकरणाकडे युवा शेतकऱ्यांचा खूप कल दिसतोय.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती ही सरळ, साधी आणि सोपी बनते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या यंत्रांवर देण्यात येणारे अनुदान. म्हणजे शेतकरी हा आधुनिक पण होईल आणि कर्जात पण बुडणार नाही. पण या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
ठिबकने बागायती होईल दुप्पट
पुणे जिल्ह्यात सरासरी 436 ते 645 मिलिमीटर पाऊसमान असलेल्या भागात कालवा, पाटपाणी आणि विहीर बागायतीत ऊस, केळीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ज्वारी, सोयाबीन, तूर लागवड वाढत आहे. डाळिंब, सीताफळ आणि अंजीर लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना ठिबकद्वारे पाणी दिल्यास मोठी बचत होईल. तूर आणि रब्बी ज्वारी या पिकांना ठिबकने पाणी दिल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन हेक्टरी 40 क्विंटल, तर तुरीचे 25 ते 30 क्विंटलपर्यंत मिळविणे शक्य आहे. ठिबक पद्धत 100 टक्के वापरल्यास बागायतीचे क्षेत्र दुप्पट होऊ शकते यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबकवर भर देणे गरजेचे आहे.
शेतकरी होतोय ग्लोबल
मल्टीमीडिया, कम्युनिकेशन क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, तंत्रज्ञान, इनॉव्हेटिव्ह प्रयोग स्थानिक पातळीपर्यंत प्रभावीपणं पोहोचवण्यासाठी अजूनही प्रचंड वाव आहे. या कामामध्ये नवीन माध्यम “इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कृषी विस्तार, आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. नवीन माध्यमामध्ये मोबाईल फोन, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया यांचा समावेश होतो. शेतीविषयक माहिती तसंच नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी साधन आहे. आजच्या युगात इन्फॉर्मेशन ही पॉवर आहे. यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकेंद्रित समाज निर्माण होतो.
मोबाइल फोन हे एक महत्त्वाचं असं नवीन माध्यम आहे. सध्या मोबाइल फोनचा “रीच’ ग्रामीण भागात फारच वाढला आहे. मोबाइलद्वारे शेतीविषयक माहिती -हवामान अंदाज, पीक सल्ला, बाजारभाव आणि शासनाच्या योजनांची माहिती स्थानिक भाषेत दिली जाते आहे. या माहितीचा शेतकऱ्यांना रोजचे निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो. यामुळे शेतमालाच्या उत्पादन आणि मार्केटिंगमधील जोखीम टाळता येते तसेच उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते. या माहितीचं उपयुक्तता मूल्य जास्त असल्याने शेतकऱ्यांचे सबलीकरण होण्यास मदत होते.
ही माहिती शेतकऱ्यांना मोबाइलवर वेगाने, थोडक्यात व सारांशरूपाने मिळते. भारतामध्ये काही संस्था, कंपन्यांनी आय.सी.टी. टूल्स आणि मोबाइल फोनद्वारे शेतीविषयक माहिती देण्याचे सुरू केले आहे. या प्रत्येकांच्या कण्टेंट आणि स्वरूपामध्ये विविधता आहे. कृषी क्षेत्रात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा (खउढ) म्हणजेच नवीन माध्यमांचा (वेब, डिजिटल, मोबाइल, सोशल) वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
याचा फायदा प्रगतशील युवा शेतकऱ्यांना शेतमालाचे गुणवत्ताक्षम अधिक उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी होत आहे. म्हणूच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगातील तळागाळातील आपला शेतकरी खऱ्या अर्थाने ग्लोबल बनत आहे.