नवी दिल्ली : स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. ‘लताजींसारखा कलाकार शतकांतून एकदा जन्माला येतो. लतादीदी या उत्तम माणूस होत्या. त्यांचा स्वर्गीय आवाज आता कायमचा शांत झाला आहे. पण त्यांचं गाणं अमर राहील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,’ अशा शब्दांत कोविंद यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ४ वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार असून ४.३० ते ५ दरम्यान ते दादरमधील शिवाजी पार्कमध्ये पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनाने संपले आहे.
लता मंगेशकर यांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं अंतिम दर्शनासाठी लतादीदींचे पार्थिव ठेवले जाणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. ‘दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,’ अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.