पुणे – अकरावीची अंतिम प्रवेश फेरी सुरू आहे. ही प्रवेश फेरी दि. 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत होत आहे. मात्र, शुक्रवारी नाशिक येथे काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी नाशिकसह पुण्यातही अकरावी अंतिम फेरीत प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. दि. 18 तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
अकरावीच्या आत्तापर्यंत नियमित, विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार आत्तापर्यंत 8 फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत 95 टक्के मुलांना अकरावीत प्रवेश मिळाला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कुठेच प्रवेश घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम फेरी राबविण्यात येत आहे.
“प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यानुसार ही अंतिम प्रवेश फेरी होत आहे. मात्र, नाशिकमध्ये काल काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही. त्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे एक दिवस मुदतवाढ वाढविण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली. परिणामी पुण्यातही प्रवेशासाठी एक दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.