पुणे- मागील महापालिका निवडणुकीत पुणेकरांना सत्ताधारी भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नसल्याचा दावा करत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येणार आहे.
यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून “क्या हुआ तेरा वादा…’ ही प्रश्न मालिका सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रश्नांच्या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र, या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र, भाजपचे वायदे म्हणजे “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी ठरली. भाजपच्या या “मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे, असे जगताप यांनी सांगितले.