पुणे – नवा कांदा बाजारात येऊ लागल्याने कांद्याचे दर आटोक्यात आले असले तरी तूर्तास कांद्याची निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भारतात जास्त न वापरल्या जाणाऱ्या कृष्णपूरम कांद्याच्या मर्यादित निर्यातीस मात्र सरकारने परवानगी दिली आहे.
परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, काही बाबी लक्षात घेऊन कृष्णापूरम कांद्याच्या 10 हजार टनाच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. हा कांदा भारतीय स्वयंपाक घरात जास्त वापरला जात नाही. तो थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये वापरला जातो. म्हणून या कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. हा कांदा निर्यातीसाठीच उत्पादीत केला जातो.
मात्र, भारतात वापरला जाणारा कांदा बाहेर देशात जाऊ नये म्हणून घालण्यात आलेली निर्यात बंदी अजूनही कायम आहे. सध्या कांद्याचे दर साधारणपणे 60 रुपये प्रति किलो या पातळीवर आले आहेत. ते काही महिन्यापूर्वी 160 रुपये प्रति किलो इतके वाढले होते.
दरम्यानच्या काळात सरकारने बराच कांदा आयात केला आहे. मात्र, त्या कांद्याची चव देशातील कांद्यापेक्षा वेगळे असल्यामुळे आणि देशातील कांदा कमी दरावर उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने आयात केलेला कांदा राज्यांनी खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आयात कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. असे असताना काही शेतकरी संघटनांनी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याची सध्याची वेळ योग्य आहे. अन्यथा कांद्याच्या किंमती कोसळण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविलेली नाही.