पुणे – गोकुळाष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. त्यास कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात. श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले.
गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच. मूठभर पोह्यांसाठी आपल्या मित्राला सुवर्ण नगरी करून देणारा हा कृष्णच.
गोकुळाष्टमी उत्सवासाठी जो प्रसाद बनवला जातो त्यास गोपाळकाला असे म्हणतात. अनेक गोष्टी एकत्र करून हे मिश्रण तयार केले जाते. यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हाच दहीकाला खाऊन गोकुळाष्टमीचा उपवास सोडण्याची प्रथा आहे.
याच दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचीदेखील प्रथा आहे. कृष्णाला हा काला अतिशय प्रिय होता म्हणून प्रसाद म्हणून काल्याचे सेवन केले जाते. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून, त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे.
तर दुसरीकडे श्रीकृष्णाला दही, लोणी, दुध-तूप यांची आवड होती. लहानपणी यशोदा या गोष्टी त्याच्यापासून लपवून उंच शिंक्यावर ठेवत असे. मात्र आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते.
आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो. अशाप्रकारे या दोन्ही गोष्टींचे प्रतीक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोकणात आणि मुंबईमध्ये हा दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.
एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर उभे राहून उंचच्या उंच थर उभे केले जातात. शेवटी एकमेकांच्या आधाराने उंचावर टांगलेला मडके फोडले जाते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचा आवडता काला असतो. हाच काला प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.