नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून त्यातही उत्तर भारतात पावसाने धुमाकुळ घातला आहे. दरम्यान, हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. तर आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सलग पाऊस नसला तरी अधून मधून मुसळधार सरी बरसत आहेत.
तर उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अजूनही सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र या आठवडाभरात हा पण बदल होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे