लोणावळा – अभिनेता आकाश चौधरीचा ट्रिपसाठी लोणवळ्याला जाताना अपघात घडला आहे. एका ट्रक चालकाने आकाशच्या कारला धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली. मात्र या अपघतात कोणालाही गंभीर दुखापत झालेले नाही. आकाशने सीटबेल्ट बांधला असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या संपूर्ण घटनेमुळे तो हादरून गेला आहे. या अपघाताची माहिती त्याने एका मुलाखतीत सविस्तरपणे दिली आहे.
आकाश चौधरी म्हणाला की, “ट्रकने धडक दिली तेव्हा काय घडले हे मला कळालेच नाही. मला दुखापत झाली नाही, परंतु या अपघाताने मी हादरून गेलो आहे, माझी झोप उडाली. मी सुट्टीवर होतो, पण मला रात्री झोप आली नाही. रस्त्यावर काय घडू शकलं असतं हा विचार करून मी रात्रभर घाबरत होतो. आयुष्य किती नाजूक आणि अस्थिर असू शकते याची मला जाणीव झाली. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे.”
या अपघातानंतर आकाशने त्या ट्रक चालकाला चांगलेच खडसावले. मात्र आकाशने त्याची तक्रार मागे घेतली. याबाबत तो म्हणाला की, “रस्त्यावरील अपघातामुळे वैभवी उपाध्याय आणि देवराज पटेल यांसारखे अनेक कलाकारांनी जीव गमावला आहे. मी रस्त्यावर गाडी चालवताना आता खूप घाबरलो आहे. हे ट्रक चालक अत्यंत बेशिस्तपणे वाहन चालवतात. मात्र पोलिसांनी खूप तत्परता दाखवत ड्रायव्हरला अटक केली. पण मी माझी तक्रार परत घेतली, कारण तो ड्रायव्हर फार गरीब होता.” दरम्यान, आकाशला ‘भाग्यलक्ष्मी’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.