कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील काकडी विमानतळाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी निधी दिला आहे. त्याबद्दल श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते.
देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री साईबाबांचे देश विदेशात असंख्य साईभक्त आहेत. या साईभक्तांना शिर्डीत साईबाबांचे दर्शनासाठी येण्यासाठी काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले. मात्र काकडी विमानतळ जरी आंतरराष्ट्रीय असले तरी नाईट लॅंडिगचा झालेला बट्ट्याबोळ व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे काही वर्षापासून हे विमानतळ समस्यांच्या चक्रव्युहात अडकले होते. त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना सोयी-सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
साईभक्तांमध्ये नाराजी पसरल्यामुळे शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या रोडावली होती. त्याचा परिणाम काकडी विमानतळावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांवर झाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आ. काळे यांच्यावर सोपविली. काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या,यासाठी आ. काळे यांनी आग्रह धरला. त्यासाठी पाठपुरावा केला.
मंत्री पवार यांनी काकडी विमानतळाला 150 कोटी निधी दिला आहे. त्यामुळे साईभक्तांना अडचणी दूर होणार आहे. शिर्डी विमानतळ हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. कार्गो सेवा सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून पूर्ण क्षमतेने कार्गो सेवा सुरु होवून राज्याच्या आर्थिक व्यवस्थेस कार्गो सेवेतून हातभार लागणार आहे. याबद्दल आ. काळे यांनी मंत्री पवार यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.