चिंतन शिबिर : लोणावळ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे आश्वासन
लोणावळा – कोळी समाजाचे विविध प्रश्न अद्यापही प्रलंबित असून, या समाजाच्या सर्व प्रश्नांना न्याय देऊन हे प्रश्न अग्रक्रमाने सोडविणार आणि कोळी बांधवांचे स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज दिले.
लोणावळा येथे कोळी महासंघाने आयोजित केलेल्या चिंतन शिबिरामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्रातून सुमारे 3 हजार कोळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बोलताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, राज्यामधील कोळी समाज आजही मोठ्या प्रमाणात उपेक्षित आहे. राज्य सरकारने जात पडताळणी संदर्भात काढलेल्या शासन निर्णय हा 11 महिन्यांचा आहे. परंतु 11 महिन्यांच्या शासन निर्णयाची मुदत वाढविण्याच्या दृष्टीने व याचा लाभ कोळी बांधवाना होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
मुंबईतील मच्छिमार तसेच मासे विक्री करणाऱ्या कोळी बांधवांना पालिकेकडून परवान्यासाठी त्रास देण्यात येतो. कोळी बांधवांचा हा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रश्न धसास लावण्यात येईल, असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून मच्छिमारांना अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. जेणेकरुन मच्छिमार बांधवांना आपला व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. कोळी बांधवांच्या जात पडताळणीचा विषय अधिक गंभीर असून, जात पडताळणीची पुनर्तपासणी करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.
मच्छिमारांना मिळण्याऱ्या डिझेलच्या परताव्यासाठी सुमारे तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो, त्यांचे यामुळे नुकसान होत आहे, त्यामुळे डिझेलचा परतावा सहा महिन्यांत मिळण्यासाठी लक्ष घालण्यात येईल. रक्ताचे संबध असलेल्या प्रकरणांमध्ये म्हणजे, वडील कोळी असतील तर त्यांच्या मुलाला कोळी समाजाचा दाखला देण्यामध्ये शासकीय स्तरावर आडकाठी होत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. परंतु वडील कोळी समाजाचे असतील तर त्यांच्या रक्ताच्या संबंधातील नात्यांना अन्य काही कागदपत्रांचा ससेमिरा दूर करुन तो दाखला लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
शिवडी न्हावा सी लिंक प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यासाठी शासनाकडे आग्रह करण्यात येणार आहे, तसेच नवी मुंबईमध्ये बाधीत झालेल्या बोटींना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने व धरमतरखाडीमध्ये वादळामुळे बाधित झालेल्या बोटी तसेच कोकणातील क्यार वादळाच्या तडाख्यामुळे मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे. जे मासेमारी करू शकत नाही त्या मच्छिमारांना शेतकऱ्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी मांडली.
विविध विभागाच्या समाज बांधवांनी आपली निवेदन यावेळी विरोधी पक्ष नेत्यांकडे दिली. या सर्व प्रश्नांच्या निवेदनात लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगतिले. यावेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.