खंडणीसोबतच एक वेगळाच राग होता मनात
पिंपरी – चाळीस लाखांच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. खून झालेल्या तरुणाची मैत्रीण त्याच्याशी नेहमीच गोड बोलते, माझी मैत्रीण का बोलत नाही? असा राग खून करणाऱ्यांच्या मनात होता.
मयत अब्दुल आहाद यांची मैत्रीण त्याच्याशी नेहमीच गोड बोलते मात्र आपली मैत्रीण बोलत नव्हती. याचाही राग आपल्या मनात होता, अशी धक्कादायक कबुली आरोपी उमर याने पोलीस तपासात दिली आहे.
उमर नासीर शेख (वय 19, रा. इंदिरानगर, वसाहत, खडकी) असे अपहरण आणि खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अब्दुल आहाद सय्याब सिद्धीकी (पस 17, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी उमर याला अटक केल्यावर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 17 जानेवारीपर्यंत (सहा दिवस) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मयत अब्दुलआहाद आणि आरोपी उमर, या दोघांनाही मैत्रीण होती. मात्र अब्दुलआहाद याची मैत्रीण तासन्तास त्याच्याशी फोनवर गप्पा मारत बसायची. परंतु उमर याची मैत्रीण फोनवर बोलत नव्हती. यामुळे त्याच्या विषयी उमर याच्या मनात अगोदरपासूनच राग होता, अशी कबुली आरोपी उमर याने पोलिसांना दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. यामुळे तो मैत्रीणीशी बोलत असतानाच त्याचा काटा काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
चित्रपट पाहून सुचली कल्पना
आरोपी उमर याला महागडी मोटार घ्यायची असल्याने त्याने आपला मित्र अब्दुलआहाद याचे शनिवारी रात्री अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडे 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी उमर याला अटक केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. दाक्षिणात्य चित्रपट “खतरनाक खिलाडी’ भाग दोन हा चित्रपट पाहून अपहरण आणि खून करण्याची कल्पना सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.