कोल्हापूर – राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासाठी राज्यात शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. याच धर्तीवर राज्यात प्रथम कोल्हापूर जिल्ह्यात व्यक्तींची जातीवाचक नावे व आडनावे स्वेच्छेने बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. राजर्षी शाहू जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून 26 जून पासून या मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जगन कराडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात त्याकाळी अनुसूचित समाजाच्या पैलवानांची नावे सरदार व पंडित अशी देऊन त्यांच्या नावाविषयी भेदभाव निर्माण होऊ नये याची काळजी घेतली होती. तसेच त्यांच्या राजवाड्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नावे बदलून त्यांना ढाले, बनगे या प्रकारची नावे देऊन त्यांची जातीवाचक असणारी ओळख संपवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी अथक प्रयत्न केले होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यात जातीवाचक नावे, आडनावे, अपभ्रंश झालेली नावे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या मोहिमेमुळे व्यक्तीची पूर्वाश्रमीची जातीवर आधारित कनिष्ठतेची निर्माण होणारी भावना नष्ट होऊन व्यक्तीची तिच्या उन्नतीसाठी सकारात्मक भावना तयार होईल. आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. याबरोबरच जातीवाचक नावे व आडनावामुळे निर्माण झालेले पूर्वग्रहदूषित विचार नष्ट होण्यास मदत होईल व सामाजिक समानता अस्तित्वात येईल.
महसूल व ग्रामपंचायत अभिलेखात अशी नावे शेकडो वर्षे तशीच असून आता ती बदलण्यास या मोहिमेमुळे वेग येईल. 7/12 उतारा, मालमत्ता पत्रक, कर आकारणी, ग्रामपंचायत घर उतारा या सर्व ठिकाणी अशी नावे असतील व नागरिकांनी इच्छा प्रदर्शित केल्यास ती बदलण्यासाठी सर्व ग्रामस्तरीय कर्मचारी स्वतःहून मदत करतील व यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे सांगून “महसूल जत्रा” कार्यक्रमात गावागावातील नागरिकांची नावे व आडनावे बदलण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून ही मोहीम चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी तलाठी, ग्राम सेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांच्यासह सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपून सहकार्य करावे.
तसेच नाव, आडनाव बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांनी ‘आपले सरकार’, ‘सेतू’ सुविधा केंद्राच्या ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येऊन याबाबतची कार्यपद्धती आखून दिली जाईल. नागरिक व खातेदारांनी यासाठी संबधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.