पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात स्वारगेट व शिवाजीनगर बस स्थानकातून मंगळवारी सकाळपासून बसेस सुरू केल्या जाणार आहेत.
कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने पुणे, मुंबई या शहरांचा कोल्हापूर व सांगली शहराशी पूर्णत: संपर्क तुटला होता. या मार्गावर गेल्या आठवडभरापासून राज्यभरातून कोणतीही वाहतूक सुरू नव्हती. पुणे शहरातून कोल्हापूर, सांगली शहर व ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु, रस्ते बंद असल्याने मागील सात दिवसापासून स्वारगेट स्थानकातून एस.टी बसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या.
पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग मागील सात दिवसापासून बंद होता. ही वाहतूक रविवारी दुपारनंतर सुरू झाली आहे. परंतु, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने एस.टी अडकण्याची शक्यता आहे. यामुळे, मंगवारी सकाळपासून स्थानकातून कोल्हापूर व सांगली एस.टी. वाहतूक सुरू होणार आहे.