तालुक्यात पूरस्थिती असताना युवानेते परदेशवारीवर
पाटण – पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या टिकेला जोरदार प्रतिउत्तर दिले तर पाटणमध्ये पूरपरिस्थिती असताना राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर परदेशवारीवर होते. त्यांना तालुक्यातील जनतेची काळजी नसल्याची टीका पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी यावेळी केली.
पाटणच्या पूरस्थितीची पाहणी पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी सोमवारी केली. पूर पाहणी दौऱ्यानंतर विजयबापू शिवतारे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. माजी मुख्यमंत्री यांनी कराड येथील संरक्षक भिंतीबाबत पालकमंत्र्यांचे विधान पोरकट असल्याची टीका केली होती. याला पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी प्रतिउत्तर दिले. संरक्षण भिंतीचे बांधकाम रखडल्यानेच शहारात पाणी घुसल्याचा पुर्नउच्चार करून पालकमंत्री स्वत: इंजीनिअर असल्याचा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकार परिषदेत लगावला.
कोयनाकाठी बांधण्यात आलेल्या 800 मीटर संरक्षण भिंतीमुळे कराड शहरात पाणी घुसले नाही. मात्र अपुर्ण असलेल्या ठिकाणी कोयना नदीचे पाणी पाटण कॉलनीत घुसले. पुराची धोक्याची पाणीपातळी 567 मिटर आहे. त्यामुळे रखडलेली 568 मिटरचे बांधकाम केले असते तर कराड शहराला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला नसता असेही ना. शिवतारे यांनी सांगितले.
ना. शिवतारे पुढे म्हणाले, पाटण मधील जनता पूरस्थितीत असताना राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर हे परदेश वारीवर होते.
पाच दिवस पाटण मधील जनता पूरस्थितीचा सामना करत होती. मात्र हे नेते ग्रीसमध्ये होते. या आपत्तीकाळात आ. शंभूराज देसाई यांनी जीव धोक्यात घालून परिसरातील 100 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पाटणमध्ये वाहतुकीसाठी रस्ते मोकळे नसताना जेसीबीमधून येवून त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली. त्यामुळे निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकांमध्ये रहावे लागते, अशी टीका पाटणकर यांच्यावर केली. पाटण दौऱ्यावर आलो असल्याने मला भेटायला त्यांना का जमले नाही. लोकांचा कळवळा असता तर ते मला नक्की भेटायला आले असते. मात्र खोटा कळवळा दाखविणाऱ्यांना जनता लांब ठेवते, अशीही टीका पालकमंत्री शिवतारे यांनी केली.