माण तालुक्याने साधली हट्रीक : तालुकास्तरावर दोरगेवाडी व पानवणची बाजी
गोंदवले – 2019 च्या वॉटरकप स्पर्धेत पुन्हा माण तालुक्याने बाजी मारली असून तालुक्यातील शिंदी खुर्द गावाने राज्यात दुसरा नंबर मिळवला. माण तालुक्याने राज्यस्तरावर सलग तीनवर्ष नंबर मिळवून वॉटरकप स्पर्धेत हॅट्ट्रीक साधली आहे.
गेली दोन वर्ष सातत्याने वॉटरकप माण तालुक्यात आला असून 2017 रोजी राज्यात बिदालने तिसरा नंबर मिळवला होता. त्यानंतर 2018 ला राज्यात पहिला टाकेवाडी तर दुसरा भांडवली गावाने नंबर मिळवला होता. आणि यावर्षी शिंदी खुर्दच्या रुपाने पुन्हा वॉटरकप माणमध्ये येऊन हॅट्ट्रीक साधणार का? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आणि विशेष म्हणजे आज वॉटरकपचा निकाल समोर आला आणि यामध्ये राज्यात दुसरा क्रमांक शिंदी खुर्दनेच मिळवला. तसेच तालुका स्तरावर दोरगेवाडी पाणवन या गावाने नंबर मिळवले.
वॉटरकप स्पर्धेला 2016 साली सुरुवात झाली. 2017 साली प्रथमच माण-खटावचा समावेश झाला. एकीकडे प्रंचड दुष्काळ त्यामुळे सर्व घटकांना त्याची झळ बसलेली होती. याचवेळी माण तालुक्यात पाणी फौंडेशनची समन्वयक म्हणून अजित पवार डॉ. प्रदिप पोळ, प्रफुल्ल सुतार यांची नियुक्ती झाली. त्यांनी प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे तत्कालीन तहसिलदार सौ. सुरेखा माने यांना सोबत घेऊन तालुका पिंजून काढला. त्यानंतर सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख डॉ. नितीनजी वाघमोडे, उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. नामदेव भोसले, मोटार वहातूक निरीक्षक गजानन ठोंबरे, आयपीएस अधिकारी प्रविण इंगवले, एआरटीओ स्वप्नील माने, तहसिलदार अमोल कदम, पीएसआय पोपटराव पिंगळे यांनी मुंबई, पुणे येथे ग्रामसभा घेऊन जलसंधारण चळवळीची जाणीव करुन दिली. त्यानंतर माण तालुक्यात चांगलेच अर्थसहाय्य मिळाले. याशिवाय सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी यांनी मोलाची साथ दिली. मागील अनुभवाच्या जोरावर शिंदीकरांनी कोणतीही कसर ठेवली नाही, सूक्ष्म नियोजन केले होते.
माण तालुक्याला स्पर्धा नवीन नसली तरी शिंदी खुर्द गावासाठी ही स्पर्धा मात्र आव्हानात्मकच होती. अतिशय दुर्गम भाग, चारी बाजुने डोंगर, त्यामुळे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात 100 जण मुंबईला तर 50 जण पुणे येथे तसेच इतर ठिकिणी 50 जण नोकरी निमित्त आहेत. या गावाला 1400 हेक्टर क्षेञ आणि कुटुंब अवघी 328 होती. खातेदार संख्या 879 असूनही शेती योग्य क्षेत्र फारच कमी, पण आयुष्यभर डोंगर पाया खालून घालणाऱ्या शिंदीकरांनी मात्र हे आवाहन खूप कष्टाने पेलले. ज्या महिलांनी कधी दुसऱ्याचा बांध बघितला नाही अशा महिलांनी शोषखड्डे खोदले, झाडांना खड्डे काढताना हाताला फोडही आले, मात्र पुढे त्यांनी वॉटरकप आणि हिरवे शिवार दिसत होते. अशातच या लोकांनी 43 डिग्रीमध्ये हे काम पूर्ण केले.