कोल्हापूर :- राज्यात काही दिवसांपासून मान्सूनचा जोर वाढला असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशीच घटना रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कोल्हापूरकरांची चिंताही वाढविली आहे.
भूस्खलनचा धोका असलेल्या देशातील 147 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले आहे.
इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. भूस्खलनचा धोका असलेल्या गावांमध्ये राधानगरीमधील 31, शाहूवाडी 20 तर भुदरगड तालुक्यातील 11 गावांसह पन्हाळा, गडहिंग्लज, कागलसह अन्य तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना देणाऱ्या नोटीस प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या आहेत.
मुसळधार पाऊस झाला की कोल्हापूरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणं, भूस्खलन आणि रस्ते खचण्यासारख्या घटना घडत असतात. पावसाळा सुरू होताच जिल्हा हायअलर्टवर असतो. त्यातच आता रायगडच्या भीषण घटनेनंतर कोल्हापूरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे नोटीस पाठवण्यात आलेल्या नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर होणे गरजेचे आहे. कारण रायगडनंतर आता कोल्हापुरमधील 76 गावे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यांना योग्य वेळेत स्थलांतरित करणं गरजेचं आहे .